आले चांगले दिवस : रुपया मजबूत झाल्याचा परिणामनाशिक : लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणीत स्थिर सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर बाजारात सुरू झालेल्या उलाढालीचे परिणाम सोने-चांदीच्या किमतीवरही दिसून आले. परकीय गुंतवणूक वाढून परकीय चलन देशात वाढल्यामुळे मजबूत झालेल्या रुपयाने सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण घडवून आणली. बाजारात झालेल्या चढउतारात गेल्या दोन दिवसांत मोठी उलाढाल झाली. त्यात स्थिर सरकारच्या अपेक्षेने बाजारात मोठ्या प्रमाणात परकीय पैसा गुंतविला गेला. त्यामुळे परकीय चलन येऊन त्या तुलनेत रुपया मजबूत झाला. मजबूत झालेल्या रुपयाच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाल्याने सुवर्ण पेढ्यांमध्ये दोन दिवसांत सोन्याचे दर प्रतितोळ्यामागे ७०० रुपयांनी घसरले. सध्या सोने आणि चांदीची मागणीही घटली असल्याने या किमतीत आणखीच घसरण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत बाजारात आणखी मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने परकीय गुंतवणूक वाढून रुपयाला आणखी मजबुती येऊ शकते. त्यातून सोने आणि चांदीच्या किमती खाली येऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात हे सगळे नव्या सरकारच्या निर्णयांवर अवलंबून असणार आहे. किमती खाली येतीलगेल्या काही वर्षांपासून केंद्र शासनाने आयात-निर्यात धोरणाबाबत घेतलेल्या निर्णयातील धरसोडीमुळे सुवर्ण व्यावसायिकांना त्रास झाला. आयात शुल्क वाढविल्याने सोन्याची चोरटी आयात वाढून महसूलही कमी झाला. आता नव्या सरकारने त्या धोरणात बदल केल्यास सोने-चांदी खर्या किमतीवर येऊ शकतील. याशिवाय सुवर्ण त्रिकोणाला रेल्वेने जोडल्यास आणि धुळे, नरडाणा, इंदोर प्रकल्प झाल्यास व्यापार आणखी सुटसुटीत होईल. या अपेक्षा नव्या सरकारकडून आहेत. - राजेंद्र ओढेकर (अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक)
सोने-चांदीच्या भावात घसरण
By admin | Updated: May 19, 2014 00:33 IST