शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक

By admin | Updated: September 13, 2015 02:44 IST

बिहारच्या समरांगणात राजकीय लढाईचा शंखनाद दशदिशांनी दुमदुमतो आहे. देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याची क्षमता या लक्षवेधी संग्रामात आहे. वस्तुत: बिहारमधे मोदी

- सुरेश भटेवरा (लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत.)

बिहारच्या समरांगणात राजकीय लढाईचा शंखनाद दशदिशांनी दुमदुमतो आहे. देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याची क्षमता या लक्षवेधी संग्रामात आहे. वस्तुत: बिहारमधे मोदी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नाहीत, तरीही वरकरणी मुख्यमंत्री नितीशकुमार विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असे या रंगतदार लढतीचे चित्र दिसते आहे. एकप्रकारे मोदी सरकारच्या कारकिर्दीच्या सार्वमताचे स्वरूपच या निवडणुकीला प्राप्त झाले आहे. साहजिकच भाजपाची सारी प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. गेल्या वर्षभरात नितीशकुमारांच्या लोकप्रियतेला काहीसे ग्रहण लागले. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाला. मुख्यमंत्रिपदी त्यांनीच बसवलेले जीतनराम मांझी बंडखोरी करून सोडून गेले. तरीही नितीशकुमारांशी स्पर्धा करू शकेल असा सर्वमान्य चेहरा आज भाजपाकडे राज्यात नाही. पक्षात नेतेपदासाठी स्पर्धा आहे. मित्रपक्षांच्या नेत्यांनीही निवडणुकीपूर्वीच अडवणुकीचे रंग दाखवायला सुरूवात केली आहे. साहजिकच भाजपाने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा दावेदार घोषित केलेला नाही. तरीही राजकीयदृष्ट्या दोन्ही बाजू तुल्यबळ आहेत.जाती जमातींचे अंकगणित, धनशक्ती, मनगटशक्ती, अशा विविध स्तरांवर उभय पक्षांनी बारकाईने कलाकुसर सुरू केली आहे. निवडणुकीची हवा आज कोणाच्याही बाजूने झुकलेली नाही. म्हणूनच यंदाची लढाई तशी सोपी नाही. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना अभूतपूर्व यश प्राप्त झाले याचे महत्वाचे कारण संयुक्त राष्ट्र संघाचे माजी अधिकारी प्रशांत किशोर यांच्या ‘सिटीझन्स फॉर अकौंटेबल गव्हर्नन्स’ (सीएजी) च्या हाती प्रचारयंत्रणेच्या रणनीतीची सारी सूत्रे त्यांनी सोपवली होती. प्रशांत यांचा मुक्काम या काळात गांधीनगरला मोदींच्या निवासस्थानीच होता. मोदींनी कुठे काय बोलावे, यासह प्रचाराचे सारे तपशील सीएजीचा ताफा ठरवीत असे. भाजपाचे तमाम नेते मुकाटपणे त्यांचे आदेश मानायचे. निवडणुकीत ‘चाय पे चर्चा’, ‘थ्री डी होलोग्रॅम’ सारखे अभिनव प्रयोग करून सीएजीने साऱ्या देशात मोदींची हवा तयार केली. आधुनिक तंत्रज्ञान, गोळा केलेला डेटा इत्यादीच्या आधारे नेत्याचे ब्रँडिंग, मार्केटिंग करण्यात प्रशांत प्रभावी ठरले. यंदा हेच प्रशांत किशोर बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमारांच्या प्रचारयंत्रणेचे सारथ्य करीत आहेत. मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ च्या धर्तीवर बिहारमधे ‘पर्चा पे चर्चा’ (प्रचार पत्रावर चर्चा) संपन्न झाली. ‘हर हर मोदी घर घर मोदी’ ला पर्यायी ठरणारा ‘हर घर दस्तक’(घरोघर प्रचाराचा कार्यक्रम) जद (यु) कार्यकर्त्यांनी कसोशीने राबवला. एकीकडे ४00 ट्रक्सवर बसवलेल्या भव्य एलईडी मॉनिटर्सच्या माध्यमातून प्रशांतच्या ताफ्याने, ४0 हजार खेड्यातल्या जनतेपर्यंत नितीशकुमारांना पोहोचवले. दुसरीकडे अमित शहांनी जीपीएस यंत्रणेचा वापर करीत ४00 प्रचाररथ मैदानात उतरवलेत. राजकीय रणांगणात इतकी सुसज्ज आणि प्रेक्षणीय लढाई बिहारची जनता प्रथमच पहाते आहे. मोदींना केंद्रीय सत्तेपर्यंत पोहोचवणारे प्रशांत किशोर आणि लोकसभेच्या विजयाचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित शहा यंदा परस्परांसमोर उभे आहेत. राजकीयदृष्ट्या बिहार अतिशय जागरूक आहे. इथल्या प्रचारात भू संपादन कायदा, घर वापसी, जीएसटी, आर्थिक सुधारणा, इत्यादी मुद्दे फारसे प्रभावी नाहीत. मुझफ्फरपूरच्या प्रचारसभेत उत्साहाच्या भरात मोदींनी नितीशकुमारांच्या डीएनएचा उल्लेख केला. नितीशकुमारांनी त्याला बिहारी अस्मितेचा प्रश्न बनवले. दरम्यान निवडणूक जाहीर झाली. राजकीय आतषजीचा फड रंगू लागला. आपल्या मिस्कील शैलीमुळे लालूप्रसाद प्रचार सभांमधे नितीशकुमारांपेक्षा काकणभर सरसच ठरत आहेत. तरीही नेहमीप्रमाणे जाती जमातींचे अंकगणित हाच खरा कळीचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीतही आहे. बिहारमधे जातवार मतांच्या टक्केवारीची विभागणी पुढीलप्रमाणे आहे. यादव १४%,कोईरी ५%, कुर्मी ४%, मुस्लिम १५% यातले बहुसंख्य मतदार आज नितीशकुमार, लालूूप्रसाद व काँग्रेस आघाडीसोबत आहेत. काँग्रेसकडे विशिष्ट जातीचे गठ्ठा मतदान नाही, मात्र या पक्षाला ६ ते ७% संमिश्र मतदान मिळते. या सर्वांची एकत्र टक्केवारी ४४ ते ४५ आहे. दुसरीकडे सवर्ण ब्र्राम्हण + ठाकुर + भूमीहार १८%, बनिया ७%, तर पासवानांच्या लोजपकडे ६% दलित, उपेंद्र कुशवाहांकडे ८% त्यांच्या जातीचे मतदार आहेत. सर्वांची एकत्र टक्केवारी ३९ टक्के आहे. याखेरीज महादलित १0% व अति मागास जातींचे मतदान २१% आहे, जे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहे. आपल्या बाजूने हे मतदान वळवण्यासाठी जनता दल व भाजपा आघाडीने सारी शक्ती पणाला लावली आहे. समाजवादी, राष्ट्रवादी आणि बसपा मोठया संख्येने आपले उमेदवार उभे करीत असले तरी या लढाईत तिघांचाही फारसा प्रभाव नाही. फार तर ‘वोट कटवा’ची भूमिका ते वठवू शकतात. आपल्या गोटात बंडखोर जीतनराम मांझींना दाखल करण्याचा कितपत लाभ भाजपाला होतो, याविषयी आज संदिग्धता आहे. जाती जमातींचे अंकगणित नितीशकुमारांच्या आघाडीच्या बाजूने आहे तथापि भाजपाने कोणत्याही स्थितीत निवडणूक जिंकायचीच असा निर्धार केला आहे. साहजिकच धनशक्तीचा मुबलक वापर निवडणुकीत होणार आहे. लालूप्रसादांच्या पाठिशी यादव मतदार भक्कमपणे उभे आहेत. नितीशकुमारांच्या उमेदवारांकडे त्यांची मते किती प्रमाणात वळतात, हा प्रश्न तूर्त अनुत्तरित आहे. याखेरीज दहा वर्षांच्या अँटी इनकमन्सीचा त्रासही सत्ताधारी पक्षाला होणारच आहे. बिहारमधे मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळतो आहे मात्र गतवर्षीची त्यांची लोकप्रियता बऱ्यापैकी ओसरली आहे.बिहारची निवडणूक समजा चुकून मोदी हरले तर पुढल्यावर्षी त्याचे पडसाद उत्तरप्रदेशात उमटलेले दिसतील. ही दोन मोठी राज्ये भाजपाच्या हातून निसटली तर उर्वरित कालखंडात संसदेत आणि संसदेबाहेर मोदी सरकारला प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागेल. नितीशकुमारच नव्हे तर भाजपाच्या दृष्टीनेही ही अग्निपरीक्षाच आहे.