ऑनलाइन लोकमत
बुलंदशहर, दि. २१ - कर्जाची परतफेड न केल्याने सावकाराने कर्ज घेणा-याच्या बायको- मुलांना जबरदस्तीने आपल्याच ताब्यात ठेवल्याची घटना बुलंदशहर येथे घडली आहे. रविकरण असे त्या कर्ज घेणा-या इसमाचे नाव असून दोन वर्षांपासून त्याची पत्नी व तीन मुले एका सावकाराच्या ताब्यात आहेत.
अत्यंत गरीब परिस्थितीत जगणा-या रविकरणने दोन वर्षांपूर्वी गावातील सावकार हीरा सिंहकडून ३५०० रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्ज चुकवण्याच्या वेळेस सावकाराने व्याजासहित एकूण ५० हजार रुपयांची मागणी केली. रविकरण एवढे पैसे परत न करू शकल्याने त्याला मारहाणही करण्यात आली. त्यानंतर जुलै २०१२ मध्ये हीरा काही युवकांसाह आला आणि तो रविकरणची पत्नी व तीन मुलांना घेऊन गेला.
याप्रकरणी रविकरणने पोलिसांत तक्रार नोंदवली असून आरोपी हीरा सिंह याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला तसेच न्यायालयाकडूनही दोन वेळा आदेश देण्यात आले. मात्र तरीही पोलिसांनी त्याला अटक केली नाही ना रविकरणच्या बायका - मुलांचा शोध घेतला. उलट ही केस मागे घेण्यासाठी आपल्याला धमकी येत असल्याचा आरोपही रविकरणने केला आहे.