वसई : शनिवारपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून वसई व नालासोपारा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पोलीस व निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली.पालघर जिल्ह्यात वसई व नालासोपारा हे दोन मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी आहेत. उर्वरीत पालघर, विक्रमगड, डहाणू व बोईसर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कालपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पण एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत २७ सप्टें. पर्यंत असून त्या दिवशी मात्र सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरीही निवडणूक यंत्रणा व पोलीसांनी कालपासूनच आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. अनेक चौकात तपासणीनाके उभारण्यात आले असून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने या दोन्ही मतदारसंघातील सुमारे ८०० होर्डींग्ज व बॅनर्स उतरवले आहेत. निवडणुक यंत्रणेने मोक्याच्या ठिकाणी कॅमेरामनना तैनात केले आहेत. ही निवडणुक सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी निवडणुक यंत्रणा विविध स्तरावर उपाययोजना करीत आहे. या दोन्ही मतदारसंघातील अनेक भाग संवेदनशील असल्यामुळे निवडणूक व पोलीस यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
नालासोपाऱ्यात यंत्रणा सक्रिय
By admin | Updated: September 22, 2014 09:47 IST