नवी दिल्ली: निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात आली तर सरकार स्थापनेच्या दृष्टीने कोणती पावले उचलणे शक्य आहे यादृष्टीने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी कायदा व घटनातज्ज्ञांशी सल्लामसलत सुरु केली आहे. निवडणुकीचे मतदान संपण्यापूर्वीच यास सुरुवात झाली असून गेल्या आठवडाभरात राष्ट्रपतींनी फली नरीमन व सॉली सोराबजी हे घटनातज्ज्ञ व सॉलिसिटर जनरल मोहन पराशरन यांच्यासह इतरही काही तज्ज्ञांची मते जाणून घेतली, असे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीत एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपतींची भूमिका त्या पक्षाला किंवा ाघाडीला सरकार स्थापण्यासाठी औपचारिकपणे पाचारण करणे एवढ्यापुरतीच मर्यादित असते. मात्र निकाल त्रिशंकु अवस्थेत असेल तर राष्ट्रपतींना सरकार स्थापनेसाठी स्वत:च्या विवेकाने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. त्यांनी नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा केली ते स्पष्ट झाले नाही. मतदान संपल्यानंतर दुसर्याच दिवशी घेतलेली ही भेट औपचारिक मानली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राष्ट्रपतींची घटनातज्ज्ञांशी चर्चा सुरू
By admin | Updated: May 14, 2014 04:15 IST