साधूंची गर्दी १८ जुलैनंतर
By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST
नियोजन : जगन्नाथपुरीच्या यात्रेनंतर दोन लाख साधू येणार
साधूंची गर्दी १८ जुलैनंतर
नियोजन : जगन्नाथपुरीच्या यात्रेनंतर दोन लाख साधू येणारनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू-महंत येण्यास प्रारंभ झाला असला, तरी साधूंच्या संख्येत खरी वाढ येत्या १८ जुलैनंतरच होणार आहे. ओरिसातील जगन्नाथपुरी येथे १८ जुलैपासून दहा दिवस रथयात्रेचा उत्सव सुरू होत असून, त्याचा मुख्य सोहळा आटोपल्यावर साधूंचा नाशिककडे ओघ वाढणार आहे. कुंभमेळ्याचे धर्मध्वजारोहण उद्या होत असून, येत्या २९ ऑगस्ट रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे प्रथम शाहीस्नान होणार आहे. या पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये साधूंची वर्दळ वाढली असून, देशभरातील विविध आखाड्यांतून साधू-महंत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत आहेत. तथापि, १८ जुलै जगन्नाथपुरी येथील प्रसिद्ध रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या वर्षी या मंदिरातील श्री जगन्नाथ, श्री बलभद्र, देवी सुभद्रा व सुदर्शन या चार मूर्तींचा नवकलेवर विधी होणार आहे. जुन्या मूर्तींचे विसर्जन करून नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तब्बल १९ वर्षांनी हा विधी होणार आहे. हा सोहळादेखील साधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने अनेकांनी आपले नाशिकमधील आगमन लांबवले आहे. १८ रोजी मुख्य रथयात्रेचा कार्यक्रम असून, हा सोहळा दहा दिवस चालणार आहे. तथापि, बहुतांश साधू मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर नाशिककडे कूच करणार आहेत. या यात्रेसाठी शैव, वैष्णव, नाथ व उदासी अशा चारही संप्रदायांचे देशाच्या कानाकोपर्यातून सुमारे दोन लाखांहून अधिक साधू-महंत दाखल झाले आहेत. ते तेथील कार्यक्रम आटोपून नाशिकच्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. सोहळाही महत्त्वाचासाधूंसाठी कुंभमेळ्यासह जगन्नाथपुरीचा सोहळाही महत्त्वाचा आहे. १९ वर्षांनंतर तेथे नवकलेवराचा विधी होणार आहे. त्यामुळे साधूंनी तिकडचा सोहळा आटोपून नाशिकला येण्याचे नियोजन केले आहे. आमच्या आखाड्याचे सुमारे पाचशे संत-महात्मे जगन्नाथपुरीचा सोहळा झाल्यावर नाशिकला येतील.- महंत ध्रुवदास स्वामी, दिगंबर आखाडा(फोटो आहे : १३ पीएजजेएल ६८)