ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १९ - निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसवर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची नामूष्की ओढावण्याची शक्यता आहे. काँग्रेसला या पदापासून दूर ठेवण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि एआयडीएमकेच्या जयललिता एकत्र येतील अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पारड्यात ४४ तर काँग्रेसप्रणीत यूपीए आघाडीच्या पारड्यात ५९ जागा पडल्या आहेत. विरोधी पक्षनेता या पदासाठी त्या पक्षाला किमान १० टक्के जागा जिंकणे गरजेचे असते. मात्र काँग्रेसला स्वबळावर तेवढ्याही जागा जिंकता आलेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसला यूपीएतील मित्रपक्षांच्या मदतीने विरोधीपक्ष नेतेपदावर दावा करता येणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला या पदापासून दूर ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी आणि जयललिता या सरसावल्या आहेत. तृणमूल काँग्रेसकडे ३४ तर जयललितांच्या एआयडीएमकेकडे ३७ खासदार आहेत. या दोघी एकत्र आल्यास त्यांचे बळाबळ ७१ पर्यंत पोहोचेल. हा आकडा काँग्रेसप्रणीत यूपीएपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या पदावर एआयडीएमके आणि तृणमूल काँग्रेसला दावा करणे सहज शक्य होईल. मात्र हे पद आल्यावर दोन्ही पक्षातून कोणाची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काँग्रेसकडून कमलनाथ यांचे नाव चर्चेत
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी या दोघांनीही विरोधी पक्षनेते पद स्वीकारण्यास नकार दिल्याने आता या पदावर कमलनाथ यांची नियुक्ती केली जाईल अशी चर्चा आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल असे एका इंग्रजी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
सोनिया - राहुल राजीनामा देणार ?
पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आज संध्याकाळी होणा-या पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी व राहुल गांधी हे त्यांच्या पदावरुन राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गांधी कुटुंबाचे जवळचे सहकारी व काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सोनिया गांधी व राहुल गांधींची पाठराखण केली आहे. 'पराभवाची जबाबदारी संपूर्ण पक्षाची असून सोनिया गांधी व राहुल गांधींनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही' असे अहमद पटेल यांनी म्हटले आहे.