नवी दिल्ली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) चालवल्या जाणाऱ्या लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस या देशातील पहिल्या ‘खासगी रेल्वेला’ (प्रायव्हेट ट्रेन) तासभर उशीर झाला तर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळेल. भारतीय रेल्वे आता आपल्या सेवेचा चेहरा बदलण्याच्या प्रयत्नात असून, दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस या रेल्वेंना खासगी स्वरूपात चालवले जाणार असून, त्यांच्यात प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था असतील.
दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस येत्या सप्टेंबरअखेर सेवेत रुजू होण्याच्या तयारीत असून, ही रेल्वे जर तासभर उशिरा आली तर प्रवाशांना त्याची काही भरपाई (पेआऊट्स) देण्याचा विचार आयआरसीटीसी करीत आहे, असे वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.‘आम्ही दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस चालवण्याच्या योजनांना अंतिम रूप देत असून त्यात ही रेल्वे विलंबाने आली तर प्रवाशांना काही भरपाई देण्याचा एक विचार आहे. ही भरपाई प्रवाशांच्या ई-वॉलेट्सवर काही के्रडिट किंवा भविष्यातील प्रवासात सवलत अशा स्वरूपाची असेल.