दाल सरोवरासह काश्मिरातील जलाशय गोठले उत्तर भारतात थंडीची लाट
By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST
श्रीनगर - येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले दाल सरोवर व शहरातील अन्य जलाशय गोठले असून, शुक्रवारची रात्र ही या हंगामातील सर्वात थंड रात्र म्हणून नोंदविली गेली. त्या रात्री येथील तापमान उणे ५.६ अंश सेल्सिअस एवढे होते.
दाल सरोवरासह काश्मिरातील जलाशय गोठले उत्तर भारतात थंडीची लाट
श्रीनगर - येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले दाल सरोवर व शहरातील अन्य जलाशय गोठले असून, शुक्रवारची रात्र ही या हंगामातील सर्वात थंड रात्र म्हणून नोंदविली गेली. त्या रात्री येथील तापमान उणे ५.६ अंश सेल्सिअस एवढे होते.थंडीचा कडाका वाढल्याने तापमान १.५ अंशाने घसरून शहराच्या मध्यभागी असलेले दाल सरोवर अंशत: गोठले गेले. या सरोवरात शिकारे चालवून आपले पोट भरणाऱ्या मल्लाहांनी अनेक ठिकाणी बर्फ तोडून आपले शिकारे किनाऱ्यापर्यंत नेले. शहरातील नळांमध्येही पाणी गोठले गेले होते. थंडीमुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी, दुसरीकडे पर्यटकांना मात्र ही थंडी पर्वणीसारखी वाटत आहे. पहाटेच्या वेळी दाटलेल्या धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. लडाख भागातील लेहमध्ये किमान तापमान उणे १६.४ तर कारगीलमध्ये किमान तापमान उणे १४.५ अंश एवढे नोंदवले गेले. उत्तर प्रदेशात थंडीची लाट कायमलखनौ - उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासात थंडीची लाट कायम राहिल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. बाराबंकीत धुके व थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला. येथील गोदरी गावात धुक्यातून जात असलेल्या एका ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन तरुण ठार झाले. राजधानी लखनौत सूर्याचे दर्शन झाले नाही व दिवसभर थंडीचा कडाका होता. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटवून थंडीपासून स्वत:चे संरक्षण केले.अलाहाबाद व बरेलीतही थंडीचा कडाका जास्त होता. वाराणसी, कानपूर, आग्रा, गोरखपूर, बरेली येथे तापमान सामान्य स्थितीहून बरेच कमी होते. सर्वात कमी तापमान आग्रा येथे २.८ अंश से. एवढे नोंदवण्यात आले. बिहारमध्ये थंडीचा कहरपाटणा-बिहारची राजधानी असलेले पाटणा शहर थंडीच्या लाटेत लपेटले गेले असून येथे कमाल तापमान १५.४ अंश तर किमान ५.६ अंश एवढे नोंदविले गेले आहे. धुक्यामुळे रस्त्यावरची दृष्यता सकाळच्या वेळी ५० मीटरहून कमी झाली होती. हवामान खात्याचे संचालक ए.के. सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा शहरालगतच्या ३० कि.मी. च्या परिसरात धुके दाटल्याने तापमानात ९ अंशाने घट झाली. गया येथे सर्वात कमी तापमान, ५.७ अंश एवढे नोंदविले गेले. धुक्यामुळे रस्ते व रेल्वे वाहतूकही विस्कळित झाली. अनेक गाड्या कित्येक तास विलंबाने धावत होत्या. विमान वाहतूकीवरही या वातावरणाचा परिणाम झाला.