हरीश गुप्ता, नवी दिल्लीपुढील महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी आपल्या प्रशासनात मोठा फेरबदल करण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी महसूल सचिव राजीव टाकरू यांना तडकाफडकी हटविण्यात आले. वरिष्ठ नोकरशहा असलेले टाकरू हे आयएएसच्या गुजरात तुकडीतील आहेत. त्यांना महसूल सचिवपदावरून हटवून आता ईशान्य प्रांत विकास मंत्रालयात सचिव बनविण्यात आले आहे.सामान्यपणे अर्थसंकल्प सादर करण्याच्या तीन आठवड्यापूर्वी वित्त मंत्रालयातील सचिवाची अशाप्रकारे बदली केली जात नाही. राजीव टाकरू यांच्या बदलीमुळे वित्त मंत्रालयात काम करणाऱ्या अन्य काही सचिवांबद्दल अनिश्चितता वाढली आहे. आपले पूर्वाधिकारी पी. चिदंबरम यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या नोकरशाहीत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अद्याप तसा कोणताही बदल केलेला नाही. चिदंबरम यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता काही महत्त्वाच्या आर्थिक मुद्यांवर जेटली त्यांच्याशी विचारविमर्श करणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर टाकरू यांची बदली महत्त्वाची मानली जात आहे. खत मंत्रालयात सचिव असलेल्या शांतीकांत दास यांना टाकरू यांच्या जागी नव्या महसूल सचिव बनविण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोकरशाहीतील आपल्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांची प्रमुख पदांवर नेमणूक करून पंतप्रधान कार्यालयाचा चेहरामोहरा बदलण्याची प्रक्रिया आधीच पूर्ण केलेली आहे आणि आता याच प्रक्रियेअंतर्गत येत्या काही दिवसांत आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.पंजाबचे मुख्य सचिव राकेश सिंग यांना संरक्षण मंत्रालयात नवे संरक्षण सचिव म्हणून किंवा नवे वित्त सचिव म्हणून नियुक्त केले जाऊ शकते, असे संकेत मिळाले आहेत. अनेक सचिव सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात प्रशासनामध्ये महत्त्वाचे बदल घडून येतील, असे दिसते. दूरसंचार सचिव एम. एफ. फारुकी आणि नगर विकास सचिव डॉ. सुधीर कृष्णा हे जूनच्या अखेर निवृत्त होणार आहेत. तर अवजड उद्योग सचिव सुतानू बेहुरिया जुलैअखेरीस निवृत्त होणार आहेत. हे तिघेही कॅबिनेट सचिवपदाच्या शर्यतीत होते. परंतु अजित सेठ यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यामुळे या तिघांना आता निवृत्त व्हावे लागणार आहे.
अर्थसंकल्पापूर्वी होणार केंद्रीय प्रशासनात बदल
By admin | Updated: June 15, 2014 03:02 IST