नवी दिल्ली : तणावपूर्ण अनियमित जीवनशैली आणि बाळांना स्तनपान न करणे, धूम्रपान आणि प्रदूषण हे महिलांमध्ये स्तन कर्करोगाची जोखीम वाढवितात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या रोगाबाबत देशात पूर्वीपेक्षा परिस्थिती बिकट असल्याचे मतही त्यांनी नोंदविले आहे. भारतात दरवर्षी स्तन कर्करोगाचे एक लाख नवे प्रकरणे समोर येत आहेत. चिकित्सकांचे असे मत आहे की, बदलती जीवनशैली आणि कामाच्या पद्धती अशाच राहिल्या तर अशी प्रकरणे आणखी वाढतील. सर गंंगाराम हॉस्पिटलमधील मेडिकल आॅन्कोलॉजीतील वरिष्ठ कन्सल्टंट डॉ. श्याम अग्रवाल यांनी सांगितले की, उशिरा होणारा विवाह, जंक आणि पॅकेल फूड आणि मातांकडून बाळांना पर्याप्त स्तनपान न करणे हे कर्करोगाला कारणीभूत घटक आहेत. दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमधील कन्सल्टंट आॅन्कोलॉजिस्ट डॉ. रमेश सरीन म्हणतात की, भारतात याबाबत परिस्थिती चिंताजनक आहे. उशिरा विवाह करणे किंवा विवाह न करणे, केवळ एकाच मुलाला जन्म देणे, असक्रीय जीवनशैली, कॉप्युटरवर दीर्घकाळ काम करणे ही कारणेही यासाठी जबाबदार आहेत. आॅक्टोबर महिना स्तन कर्करोग जागरुकता महिना म्हणून पाळण्यात येतो. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून याबाबत जागरुकता करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, विकसित आणि विकसनशिल या दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये या रोगाचे प्रमाण दिसून येते. पाश्चात्य जीवनशैली अवलंबल्यामुळे या रोगाचे प्रमाण वाढत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)धूम्रपान,दारूमुळे प्रमाण वाढलेडॉ. दीपा तायल म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक होते. पण, आता ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनियमित भोजन, झोपण्याच्या बदलणाऱ्या वेळा, धुम्रपान आणि दारु चे व्यसन या कारणांमुळे महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. तथापि, ३० ते ३५ वर्षे वयानंतरचे रुग्णच यात दिसून येत होते. पण, आता २० ते २५ आणि ८० ते ८५ वयोगटातील रुग्णही दिसून येत आहेत.
तणावपूर्ण जीवनशैलीमुळेच ब्रेस्ट कॅन्सर
By admin | Updated: October 29, 2016 02:27 IST