नवी दिल्ली : तत्कालीन नेहरू सरकारच्या कार्यकाळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांवर पाळत ठेवली गेल्यासंदर्भात कुठल्या प्रकारची चौकशी करण्याची योजना नाही, अशी स्पष्टोक्ती सरकारने मंगळवारी लोकसभेत दिली.एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल केंद्रीय गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी ही स्पष्टोक्ती दिली. बोस कुटुंबाच्या सदस्यांच्या पाळतप्रकरणी कुठल्याही प्रकारची चौकशी करण्याची योजना नाही. नेताजीसंदर्भातील बऱ्याच फाईल यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या असून भारताच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडे त्या पाठविण्यात आल्या आहेत. यात खोसला आयोग आणि मुखर्जी आयोगाच्या संबंधित माहितीचा समावेश आहे. काही फाईल्स केंद्र सरकारकडे आणि काही पश्चिम बंगाल सरकारकडेही आहेत, असे चौधरी यांनी यावेळी सांगितले.१९४८ ते १९६८ या कालावधीत बोस कुटुंबियांवर पाळत ठेवण्यात आली होती. या २० वर्षांपैकी १६ वर्षे पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि आयबी थेट त्यांनाच रिपोर्ट करीत होती, असे अलीकडे उघडकीस आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘बोस कुटुंबियांच्या पाळत प्रकरणाची चौकशी नाही’
By admin | Updated: May 6, 2015 00:45 IST