बोरगाव मंजू : लोकसभा निवडणुकीदरम्यान बोरगाव मंजू परिसरात बंद असलेल्या भारनियमनाने निवडणूक संपताच पुन्हा डोके वर काढले असून, उकाडा व डासांच्या उच्छादाने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वणी रंभापूर फिडर अंतर्गत येत असलेल्या बोरगाव मंजू परिसरात लोकसभा निवडणुकीदरम्यान सतत वीज पुरवठा सुरू होता. आता निवडणूक संपताच पुन्हा भारनियमन सुरू झाले आहे. या परिसरात दररोज सकाळी ६ ते ९.३० व सायंकाळी ५ ते ८.३० असे सात तासांचे भारनियमन होत असल्याने गावकरी हैरान झाले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डासांचाही उच्छाद वाढला आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. भारनियमनाव्यतिरिक्तही वीज पुरवठा खंडित होत असल्याने विजेवर आधारित लघुव्यावसायिकांचे नुकसान होत आहे. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने शेजारच्या गावातील लोक बोरगाव मंजूत येतात. परंतु, वीज पुरवठा खंडित असल्याने त्यांची अनेक कामे खोळंबतात. मंगळवारी संपूर्ण दिवसभर भारनियमन न करता वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी गावकर्यांकडून होत आहे. वीज तुटवड्याच्या नावाखाली भारनियमन करणार्या वीज कंपनीकडे निवडणूक काळात अतिरिक्त वीज कोठून आली, असा सवाल गावकरी विचारत आहेत. (वार्ताहर)
बोरगाव मंजूत सात तासांचे भारनियमन
By admin | Updated: May 18, 2014 21:31 IST