गजानन जानभोर -
वाराणशी - निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या सभेला आणि कार्यक्रमाला परवानगी दिल्यानंतरही देशवासियांना खोटी माहिती देऊन भारतीय जनता पक्षाचे नेते-कार्यकर्त्यांनी आज वाराणशीत अक्षरश: उच्छाद मांडला. भाजपा कार्यकर्त्यांचा हा उन्माद किळसवाणा आणि वाराणशीकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली आणि अमित शाह हे स्वत: कार्यकर्त्यांना भडकावित होते. शहरात कलम १४४ लागले असताना प्रशासनाची परवानगी न घेता बनारस हिंदु विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर या नेत्यांनी सकाळपासून धरणे देण्यास सुरूवात केली. अचानक सुरू झालेल्या या तमाशामुळे रस्ते जाम झाले. वाहतुकीची कोंडी झाली आणि विद्यापीठात परीक्षेला येणार्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. सत्याग्रहाच्या नावावर सुरु झालेली असत्याग्रहाची ही ड्रामेबाजी सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर अवघ्या दोन तासांत गुंडाळावी लागली. या तमाश्यातून काहीच साध्य झाले नाही मग हा स्टंट कशासाठी? असा सवाल या सांस्कृतिक नगरीने आज विचारला खरा पण या प्रश्नाचे उत्तर उन्माद चढलेल्या भाजपा कार्यकर्त्यांजवळ नव्हते. संध्याकाळी झालेल्या मोदींच्या रोडशो मधूनही हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. इथे मोदींसाठी हळुहळू अनुकुल वातावरण निर्माण होत असताना ही ड्रामेबाजी करण्याची गरजच नव्हती, अशी खंत येथील जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जेटली- शाह यांच्यासोबत असलेले भाजपा कार्यकर्ते एवढे चवताळले होते की, या आंदोलनादरम्यान रस्त्याने जात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या महिला उमेदवारालाही त्यांनी मारहाण केली. दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने धरणे दिल्यानंतर त्याला अराजकता म्हणून टीका करणार्या भाजपा नेत्यांनी आज येथे उन्मादाचे टोक गाठले. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते खोटे बोलतात, कुठल्याही प्रकरणाचा बाऊ करतात, ही गोष्ट आता नवी नाही. पण जेटली, शाह यांनी खोटारडेपणाचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाची निष्कारण बदनामी केली. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर दुपारी अनेक गंभीर बाबी समोर आल्यात. नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या पाचपैकी चार कार्यक्रमांना जिल्हा प्रशासनाने आधीच परवानगी दिली होती. यात गंगा आरतीचाही समावेश होता. फक्त बेनियाबाग येथील जाहीर सभेला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी दिली नाही. येथील सभेला परवानगी नाकारताना प्रशासनाने भाजपला दुसर्या ठिकाणी सभा घेण्यास सुचविले. बेनियाबाग हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. १९९१ मध्ये भाजपा उमेदवार श्रीशचंद्र दीक्षित यांच्या प्रचारार्थ भाजपा नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या काही मिनिटांपूर्वी समाजकंटकांनी मंचावर बॉम्ब फेकले होते. सभेला जात असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या ताफ्यावर घरांच्या छतावरून दगडही मारण्यात आले होते. हा इतिहास असल्याने मोदींच्या सभेला कुठलाही धोका होऊ नये, या हेतूने प्रशासनाने ही परवानगी दिली नाही. पण या गोष्टीचे भाजपाने भांडवल केले. प्रशासनाने दुसर्या ठिकाणी सभा घेण्याची परवानगी दिल्यानंतर सभेच्या तयारीला ३६ तासांचा अवधी होता. परंतु, भाजपाला ती सभा घ्यायचीच नव्हती. त्या सभेमुळे मिळणार्या फायद्यापेक्षा या नौटंकीमुळे जास्त फायदा होईल, हे नेत्यांचे मनसूबे होते. परंतु ते फारसे फलद्रुप झाले नाहीत. अस्सीघाट येथील कार्यक्रमाला भाजपाने परवानगीच मागितली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर या पक्षाचा आणखी एक खोटारडेपणा उघडकीस आला. गुरुवारी दिवसभर काय होणार हे काल संध्याकाळीच स्पष्ट झाले होते. सकाळच्या धरणे आंदोलनापासून तर संध्याकाळच्या रोडशोची कार्यक्रम पत्रिका रात्रीच आखण्यात आली होती. निवडणूक आयोगाविरुद्ध जाणीवपूर्वक निषेधाचा सूर लावायचा आणि आपल्या मतांत वाढ होते की काय याची चाचपणी करायची, हे यामागील भाजपाचे गणित होते, सकाळच्या धरणे आंदोलनात ते सपशेल फसले परंतु संध्याकाळच्या मोदींच्या रोडशोला मिळालेल्या प्रतिसादामुळे भाजपा वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरला. पण या दिवसभराच्या ड्रामेबाजीमुळे वाराणशीत भाजपाची अब्रू गेली. अर्थात सकाळी फज्जा आणि सायंकाळी फत्ते अशा संमिश्र उपलब्धीचे पडसाद मतदान यंत्रात कसे उमटतात, याची उत्सुकता आहेच की! च्दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने धरणे दिल्यानंतर त्याला अराजकता म्हणून टीका करणार्या भाजपा नेत्यांनी आज येथे अराजकतेचे टोक गाठले. च् राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते खोटे बोलतात,कुठल्याही प्रकरणाचा बाऊ करतात, ही गोष्ट आता नवी नाही. पण जेटली, शाह यांनी खोटारडेपणाचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाची निष्कारण बदनामी केली. च्वाराणशीत मुस्लीम मते एकवटत असल्याने हिंदू मतेही एकत्रित यावीत आणि जाती- पोट जातीच्या नावावर विखुरणारी हिंदु मते एकवटावीत हा भाजप नेत्यांचा या मागील प्रयत्न होता. च्गंगेच्या आरतीला उपस्थित राहण्याची परवानगी मिळूनही मोदी तिथे का गेले नाहीत? उलट रोहनिया येथील सभेत ‘मला गंगा मातेची भेट घेण्यापासून रोखण्यात आले, हे पाप आहे’असा बाऊ मोदींनी केला. गंगेचे राजकारण करण्यामागील मोदींचा हेतू लपून राहिला नाही.