नवी दिल्ली : जन्माला येणाऱ्या मुलात गंभीर स्वरूपाची शारीरिक व्यंगे असतील या कारणावरून मुंबईतील एका महिलेस गरोदरपणाच्या २७व्या आठवड्यात गर्भपात करू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी नाकारली.न्यायालयाने आधी दिलेल्या आदेशानुसार मुंबईतील केईएम इस्पितळातील मेडिकल बोर्डाने या महिलेची तपासणी करून अहवाल सादर केला. तो वाचून न्या. शरद बोबडे व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने या महिलेची याचिका फेटाळली. या गर्भवतीची प्रकृती ठीक आहे व गर्भाची पूर्ण वाढ होऊ दिली तरी त्यामुळे तिच्या जीवाला कोणताही धोका संभवत नाही, असे डॉक्टरांनी नमूद केले होते. गर्भाविषयी अहवालात म्हटले की, तपासण्यांवरून गर्भामध्ये कदाचित शारीरिक व्यंग असावीत असे दिसत असले तरी एवढी वाढ झाल्यावर गर्भपात केला तर मूल जिवंत जन्माला येईल. २० आठवड्यांनंतर कोणत्याही कारणाने गर्भपातास कायद्यानुसार मज्जाव आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सातव्या महिन्यात गर्भपात नाकारला
By admin | Updated: March 28, 2017 01:42 IST