नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील तीन नेत्यांनी एकत्र बसून राज्यातील संभाव्य मंत्र्यांची नावे पक्षनेतृत्वाकडे आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे देण्यासाठी निश्चित केली आहेत. विश्वसनीय सूत्रांनी गुरुवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, जालन्याचे रावसाहेब दानवे, अहमदनगरचे दिलीप गांधी, अकोल्याचे संजय धोत्रे, दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण, मुंबईतील किरीट सोमय्या आणि राज्यसभा सदस्य पीयूष गोयल यांचा या यादीत समावेश आहे. अर्थात, ही नावे राज्यमंत्रिपदासाठी देण्यात आली असली तरी गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपदही दिले जाऊ शकते, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. गोयल यांनी संपूर्ण निवडणूक प्रचाराचे अत्यंत चांगले नियोजन केले होते. ते मोदी यांचे निकटस्थ मानले जातात. त्याचवेळी नितीन गडकरी यांच्याशीही त्यांचे सख्य आहे. रावसाहेब दानवे किंवा संजय धोत्रे यांच्यापैकी एक नाव निश्चित होईल. दानवे हे पक्षात अधिक ज्येष्ठ असल्याने त्यांना झुकते माप दिले जाऊ शकते. गडकरी आणि अहीर यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर धोत्रेंच्या रूपाने विदर्भाला तिसरे मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही. शिवाय दानवे यांच्या समावेशाने मराठवाड्याला संधी मिळून प्रादेशिक समतोल साधला जाईल, असा तर्क आहे. आदिवासी समाजातून प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली आहे. याआधी पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे नाव घेतले जात होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे नाव आधी चर्चेत नव्हते; पण आता संभाव्य यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. २६ तारखेला कॅबिनेट तर नंतरच्या विस्तारात राज्यमंत्र्यांची वर्णी लागणार आहे.
राज्यातील ६ जणांची मंत्रिपदासाठी नावे
By admin | Updated: May 23, 2014 04:24 IST