ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २७ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी २६/११ रोजी मुंबईवर झालेला हल्ला, त्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हफीझ सईद, दाऊद इब्राहिम अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्याचे परराष्ट्र खात्याच्या अधिका-यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच पाकिस्तानकडून भारतावर वारंवार होणारे हल्ले, हेरत येथे भारतीय दूतावासावार झालेल्या हल्ला याबाबतही चर्चा करत हे सर्व त्वरित थांबले पाहिजे, अशी कठोर भूमिका घेतली.
मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानात न्यायालयीन प्रक्रिया गतीमान करावी अशी मागणी मोदींनी शरीफ यांच्याकडे केल्याचे परराष्ट्र खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव एकमेकांमध्ये संपर्क ठेवतील आणि परस्पर संबंध सुधारण्याकडे लक्ष देतील यावर या बैठकीत भर देण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी मोदींनी नवाझ शरीफ यांची हैदराबाद हाऊस येथे भेट घेतली, यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज याही उपस्थित होत्या. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याबाबत चर्चा करताना त्या खटल्याच्या सुनावणीबाबत तसेच या मुद्यावर पाकिस्तानच्या भूमिकेबाबतही भारत समाधानी नसल्याचे मोदींनी या चर्चेत नमूद केले.
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोदींनी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांचीही भेट घेतली. त्यामध्ये अफगाणिस्तान, भूतान, मालदीव या राष्ट्रांच्या प्रमुखांचा समावेश होता.