ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - देहरादून येथे २००९ साली झालेल्या फेक एन्काऊंटरमध्ये एका तरूणाची हत्या केल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने उत्तराखंडच्या१८ पोलिसांना दोषी ठरवले आहे. २००९ साली पोलिसांनी मेरठ येथे राहणा-या रणबीर (वय २२) नावाच्या तरूणाला गुंड ठरवत त्याला खोट्या चकमकीत ठार केले. याप्रकरणी ७ पोलिसांवर अपहरण व हत्येचा तर इतर ११ पोलिसांवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. न्यायालयाने ७ पोलिसांवर अपहरण आणि खून, १० पोलिसांवर खुनाचा कट रचणे आणि एका पोलिसावर पुरावे नष्ट करण्याचा आरोप निश्चित करत त्यांना दोषी ठरवले आहे. त्यांना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
देहरादून येथे नोकरीच्या शोधात आलेल्या रणबीरचा २ जुलै २००९ मध्ये खोट्या चकमकीत मृत्य झाला होता. त्याच्यावर २९ गोळ्या झाडण्यात आला होता. तो एक कुख्यात गुंड असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. याप्रकरणाची चौकशी प्रथम सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्यावर खूप वाद झाला. राजकीय व सामाजिक दबाव वाढल्यानंतर अखेर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली.