ऑनलाइन लोकमत
जमशेदपूर, दि. १४ - झारखंडमध्ये कावडवाल्यांच्या बसला एक ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात १३ जण ठार तर ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमशेदपूरहून रांचीच्या दिशेने जाणा-या बसची एका ट्रकशी भीषण टक्कर झआील, सरायकेला जिल्ह्यात हा अपघात घडला आणि १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातातील सर्व मृत नागरिक बिहारमधील सीवान जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान अपघातातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
झारखंडमध्ये या आठवड्याच्या सुरूवातील एका मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार झाले होते. देवघर जिल्ह्यातील बेलाबागन येथील वैद्यनाथ मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, तायवेळी चेंगराचेंगरी होऊन झालेल्या या दुर्घटनेत सुमारे ५० भाविक जखमी झाले होते.