नवी दिल्ली : जलवाहतुकीला चालना देण्यास उत्सुक असलेले रालोआ सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याबाबतचे विधेयक सादर करणार आहे. भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.नद्यांचे जलमार्गात रूपांतर केल्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल. कारण हे मालवाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे. त्यामुळे सरकारने १०१ नद्यांना जलमार्गात रूपांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे नमूद करून गडकरी म्हणाले, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक आणण्यात येईल. जलमार्गांना चालना देण्याला आपल्या मंत्रालयाने प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे रस्ता व रेल्वे नेटवर्कवरील बोजा कमी होईल; सोबतच एक स्वस्त आणि पर्यावरण अनुकूल असे वाहतुकीचे माध्यमही मिळेल. वाहतुकीचे स्वस्त साधन असलेल्या जलमार्गाचा भारतात अद्याप वापर करण्यात आलेला नाही. तथापि, चीनच्या मालवाहतुकीत जलमार्गाचा ४७ टक्के आणि युरोपच्या मालवाहतुुकीत जलमार्गाचा ४० टक्के वाटा आहे. जपान आणि कोरिया तर जलमार्गावरच निर्भर आहेत. (वृत्तसंस्था) प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण करणारसरकारने आतापर्यंत केवळ पाच नद्यांना जलमार्गाच्या रूपात घोषित केले आहे, तर ५५ नद्यांसाठी सल्लागारांची निवड करण्यात आली आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. हे प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण केले जातील. भारतात मात्र केवळ ३.३ टक्के जलवाहतूक केली जाते, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
१०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर
By admin | Updated: July 5, 2015 22:55 IST