नाशिक : धम्माची प्रगती आणि प्रचार, प्रसार होतच राहणार आहे. हा एक विचार आहे, त्याला बांध घालता येणार नाही. आजच्या काळात प्रत्येकाने बुद्धांचे विचार अंगिकारणे अपेक्षित असून, बुद्धविचार हाच मानवतेचा विचार असल्याचे प्रतिपादन दिल्ली येथील लामा लोबझॅँग यांनी केले.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित सहाव्या बौद्ध धम्म मेळव्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर अशोक मुर्तडक, प्रमुख पाहुणे रमेश बनसोड, डॉ. सुनील गायकवाड, आयोजक भदन्त सुगत, मोहन अढांगळे, स्वागताध्यक्ष नारायण गायकवाड, अण्णासाहेब कटारे, के.आर. लामा आदिंंसह मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन लामा यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. सामुहिक बुद्धवंदना झाल्यानंतर लामा बुद्ध प्रतिमेला वंदन करण्यात आले. बौद्ध धर्म हा पुरातन आणि विज्ञानावर आधारित मानवता शिकविणारा धर्म आहे. त्याचे आचरण आणि विचारधारा तितक्याच पवित्र पद्धतीने समाजात रुजविणे गरजेचे असून हे काम उपासकांना करावे लागणार आहे. अखिल मानवतेला शांती आणि सद्विचाराची गरज असून, बुद्धांचा विचारच जगाला तारणार आहे, असेही लामा यावेळी म्हणाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे रमेश बनसोड, डॉ. सुनील गायकवाड यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी भिख्कू संघाचे स्वागत करण्यात आले. धम्मकार्य आणि समाजात समजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक भन्ते सुगत यांनी केले, तर सूत्रसंचालन भन्ते आयुपाल यांनी केले. (प्रतिनिधी)
जगाला बुद्ध विचारांची गरज
By admin | Updated: November 9, 2015 00:40 IST