विंचूर : विंचूर-लासलगामार्गावरील सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. वर्षभरापासून कठडे नसणाऱ्या या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसह नवीन पुलामुळे विंचूर-लासलगाव मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.विंचूरसह पंचक्र ोशीतील गावे व लासलगाव या गावांमधील वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या येथील स्मशन-भूमीजवळील ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे तुटल्याने रहदारीच्या व नागरिकांच्या दृष्टीने पूल धोकादायक परिस्थितीत आहे. वर्षभरापासून कठडे नसलेल्या अरूंद पुलावरून प्रवास करावा लागत असल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. पुलावर दिवसभर वर्दळ असते. पुलाचे कठडे तुटलेले असल्याने दोन्ही बाजूने वाहने आल्यास वाहनधारकांना पूल पार करण्यासाठी कसरत करावी लागत होती. यामुळे वाहनधारकात नाराजीचा सूर होता. विंचूरसह पंचक्रोशीतील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. परिसरातील शेतकरी लासलगाव बाजार समितीच्या शेतमालाची वाहतूक याच रस्त्याने करीत असल्याने नेहमी वर्दळ असणाऱ्या या पुलाची दुरूस्ती करण्याबरोबरच रुंदी वाढविण्याची जुनी मागणी होती. अरूंद पुलावरून प्रवास करताना वाहनांचा अपघात होऊन जखमी होण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले होते. पुलाची अवस्था बिकट झाल्याने वाहनधारकात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.याबाबत प्रथम ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामास प्रारंभ करण्यात आला. दिवाळीदरम्यान दहा-बारा दिवस काम बंद होते. त्यानंतर मात्र युद्धपातळीवर पुलाचे व रस्त्याचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू झाले. प्रथम जेसीबी, पोकलॅण्ड मशीनच्या साह्याने पुलानजीक असलेला गाळ व माती हटविण्याचे काम करण्यात आले. पुलाखाली पाणी असल्याने आठ ते दहा दिवसांपर्यंत गाळ काढणे व फाउंडेशनचे काम सुरू होते.(वार्ताहर)
पुलाचे काम युद्धपातळीवर
By admin | Updated: January 30, 2016 22:51 IST