सिन्नर : वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत, पाणवठे कोरडे पडल्याने पाणी व भक्ष्यांच्या शोधासाठी अनेक जंगली श्वापदे गावांच्या शिवारात येऊ लागले आहेत. त्यामुळे गावकुसाला आता डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम व नैऋत्य भागातील चास-भोजापूर खोरे व सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील ठाणगाव तसेच गोदातीरीचा नायगाव परिसर बिबट्यांचे प्रभावक्षेत्र आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने डोंगरही उघडे बोडके झाले आहेत. डोंगरांच्या पायथ्याशी असलेले जलस्रोत आटल्याने दिवसा विश्रांतीसाठी बिबटे व अन्य वन्यप्राणी डोंगर-कपारीचा आधार घेतात व रात्रीच्या वेळी गाव परिसरात भक्ष्याच्या शोधात फिरतात, असा त्यांचा दिनक्रम असतो. तथापि, अंगाची लाही लाही करणारे तप्त उन्ह व जलसाठ्यांमध्ये पिण्यासाठी पाणी नसल्याने वन्यजिवांचीही घालमेल होत आहे. बिबटे, तरस, लांडगे आदि हिंस्र प्राणी पाणी व अन्नाच्या शोधासाठी गावकुसाकडे वळले असल्याचे चित्र आहे. पश्चिम भागातील ठाणगावजवळील उंबरदरी, पांढुर्ली परिसरातील बोरखिंड, कोनांबे, चासजवळील भोजापूर व सरदवाडी या धरणांमध्ये उशिराच्या पावसामुळे पाणी आले असल्याने शेतकऱ्यांना जसा दिलासा मिळाला तसाच वन्यप्राण्यांनाही मिळाला आहे. या जलस्रोतांमुळे याच भागात बिबट्यांचा नेहमी वावर असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणारे हिंस्रप्राणी गावपरिसरातील वाड्या-वस्त्यांवरील शेळ्या, वासरे यांचा फडशा पाडतात व सकाळ उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगरांच्या कडेकपारीत विश्रांतीसाठी धूम ठोकत असल्याचे चित्र आहे. पश्चिम पट्ट्यात रात्रीच्या सुमारास आजही बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावकुसाकडे
By admin | Updated: April 4, 2016 23:50 IST