नाशिक : लोकसभा निवडणुकीत ठेच लागल्याने सतर्क झालेल्या मनसेने नाशिक मॉडेलवर भर देणे सुरू केले असून, त्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक कल्पक योजना राबविण्याची घाई सुरू झाली. संपूर्ण शहर वायफाय सिटी करण्यात येणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी ट्राम सेवेच्या पर्यायाची चाचणी करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर यासंदर्भात सूतोवाच केले आहे.लोकसभा निवडणुकीत मनसेचे नाशिक मॉडेल फेल ठरल्याच्या टीकेमुळे धक्का सहन करणाऱ्या राज यांनी आता सहा महिन्यांत नाशिकच्या विविध प्रकल्पांची तयारी केली आहे. गोदापार्कच्या धर्तीवर खासगी प्रायोजकांमार्फत योजना राबविण्याचा मानस बाळगणाऱ्या राज ठाकरे यांनी ईएसडीएस कंपनीच्या सहकार्याने संपूर्ण नाशिक शहर वायफाय सिटी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. कंपनीचे सीईओ पीयूष सोमाणी यांनी राज यांची दुपारी विश्रामगृहावर भेट घेतल्यानंतर राज यांनी हा प्रस्ताव मार्गी लावण्याची सूचना केली आहे. अशा प्रकारे शहरात ट्राम सुरू करण्याच्या पर्यायाची चाचपणी करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, लवकरच एका कंपनीला हे काम देण्यात येणार आहे.शहरात दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकींची भर पडत असून, त्यामुळे वाहतूक आणि वाहनतळाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. तथापि, त्यासाठी बीआरटीएसचा पर्याय अव्यवहार्य आहे, शहरात तो साकारला जाऊ शकत नाही, असे राज ठाकरे यांनी सांगतानाच त्यावर ट्राम हा पर्याय होऊ शकतो काय याची विचारणा केली आहे. सातपूर ते नाशिकरोड अशा मार्गावर पालिकेच्या ताब्यातील जागेवर ट्राम सुरू करण्याची राज यांची योजना आहे. अशा अनेक योजनांविषयी त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली.पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले नेहरू वनउद्यान वनविभागाकडे तसेच ठेवून केवळ सुशोभीकरणासाठी वनखात्याकडे मागण्यात आले आहे. टाटा ही ख्यातनाम कंपनीने तेथे बॉटनीकल गार्डन साकारण्याची तयारी केली आहे. वनखात्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ट्रामचा पर्याय ते वायफाय सिटी
By admin | Updated: June 20, 2014 01:18 IST