नाशिक : वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर या निधीतून खिसे भरण्यासाठी काही मक्तेदार आतूर झाले असून, असाच एक मक्तेदार गावोगावी फिरून १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावांनी सौर पथदीप ‘खरेदी’ करावेत, यासाठी झोळी घेऊन फिरत आहे. बदल्यात सरपंच आणि ग्रामसेवकांचे खिसे भरण्याचे आश्वासन देत असल्याचा गौप्यस्फोट किकवारी खुर्दचे आदर्श सरपंच पुरस्कार विजेते विद्यमान उपसरपंच केदा बापू काकुस्ते यांनी केला.शनिवारी (दि. २३) नाशिकच्या सरपंच व ग्रामसेवकांच्या कार्यक्रमात व्यासपीठावरूनच अनुभव सांगताना केदा बापू काकुस्ते यांनी वरील गोष्टींचा उलगडा केला. गावच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतले. तरीही काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे जेव्हा गावाला मान खाली घालावी लागते, तो क्षण खूपच वेदनादायी असल्याचे काकुस्ते यांनी सांगितले. आताच्या केंद्र सरकारचा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वितरित केल्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील या निधीतून कंत्राटे घेणाऱ्या मक्तेदारांची चांगलीच गोची झाली आहे. म्हणूनच की काय, आता गावोगावी हे मक्तेदार फिरून गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना आमिष दाखवित सुटले आहेत. आपल्याकडेही काही दिवसांपूर्वीच एका चारचाकीतून एक मक्तेदार आला. वित्त आयोगाचा निधी तुमच्या ग्रामपंचायतीकडे वर्ग झाला आहे. आता त्या निधीतून काय करायचे हे तुम्ही ठरविले आहे काय? त्या निधीतून गावात सौर पथदीप घ्या, तुमचे आणि भाऊसाहेबांचे काय असेल ते पाहून घेऊ, असे या महाशयांनी सांगताच आपला संताप अनावर होऊन आपण पाणी न विचारता त्या मक्तेदाराला आल्या पावली परत पाठविले. त्यावेळी त्याच्या श्रीमुखात भडकावण्याइतका आपला संताप झाला होता, असे त्यांनी सांगताच उपस्थित ग्रामसेवक व सरपंंचांमध्ये हशा पिकला. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाचे दुरुस्तीविषयक काम करणारा एक मक्तेदार असाच गावोगावी फिरून सौर पथदीप पुरवठ्यासाठी प्रस्ताव गोळा करीत असल्याची जिल्हा परिषदेत आदर्श ग्रामपंचायतीच्या एकेकाळी आदर्श सरपंच पुरस्कार मिळविलेल्या उपसरपंचानेच याचा खुलासा केल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
कुणी सौर दिवा घेतं का दिवा? मक्तेदाराची गावोगावी पायपीट
By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST