त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली धरण पूर्णत: भरल्याने शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे ठरलेल्या वेळेत दररोज करण्याचे आदेश नगराध्यक्ष यशोदा अडसरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलावर्गाची होणारी गैरसोय टळली आहे. आतापर्यंत एकूण ४५६ मि.मी. पाऊस झाला आहे.त्र्यंबक शहरात असणाऱ्या अहिल्या धरणाचा व अंबोली येथील ल.पा. बंधाऱ्याच्या पाण्याचा शहरासाठी वापर करण्यात येत असतो. तथापि, अहिल्या धरणातील पाणी पाच आळी, गढई आदि अहिल्या धरणाजवळील वसाहतीसाठी होत असतो. कारण अंबोली धरणातील पाणी पाच आळीपर्यंत कमी दाबाने होत येते. अंबोलीचे पाणी सर्व शहरात वापरले जाते. साधारणत: मे-जूनमध्ये पाणी कमी झाल्याने अगोदरच दिवसाआड आणि त्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची पाळी नगरपालिकेवर आली होती. कदाचित तीन दिवसांआड पाणीपुरवठा होईल अशी शक्यता असतानाच वरुणराजा मेहेरबान झाला. धरणाच्या पाण्याची पूजा केल्यानंतर दोन दिवसांवरून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आणि गेल्या चार दिवसांपासूनच्या पावसाचे सातत्य टिकले आहे. त्यामुळे मंगळवारपासून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, असा अहवाल पाणीपुरवठा प्रमुख बाळ फसाळे यांनी दिला. यामुळे मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी कार्यालयीन आदेश देऊन दररोज पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)
त्र्यंबकला दररोज पाणीपुरवठा
By admin | Updated: July 30, 2014 00:23 IST