सिन्नर : वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे वडांगळी येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्रामस्थांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सततच्या भारनियमनाने वडांगळी परिसरातील शेतकरी त्रस्त झालेले असतानाच शेतीबरोबरच पाणीपुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम झाला आहे. आठपैकी दोन ते तीन तासच वीजपुरवठा होत असतो. त्यामुळे वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ भरण्यास मोठी अडचण येत आहे. विहिरीत पुरेसे पाणी असतानाही केवळ खंडित व अपुऱ्या दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडांगळी वीज उपकेंद्रातून पाणीपुरवठा योजनेला सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी सरपंच सुनीता सैंद व उपसरपंच नानासाहेब खुळे यांनी वीज वितरणकडे केली आहे. केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक विद्युत विकास योजनेसाठी वडांगळी गाव पात्र आहे. २४ तास थ्री फेज वीजपुरवठा करणाऱ्या सदर योजनेचे संथ गतीने सुरू असलेले काम पूर्ण झाल्यास वडांगळी पाणीपुरवठा योजनेसह व्यावसायिकांनाही लाभ होणार आहे. सदर योजनेचे काम तत्काळ पूर्ण करून वडांगळीकरांना दिलासा देण्याची मागणी उपसरपंच खुळे यांनी केली आहे. (वार्ताहर)
खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत
By admin | Updated: January 9, 2017 00:42 IST