नामपूर : पंचक्रोशीत पाणीच नसल्याने गावात जिकडे तिकडे पाण्यावरच चर्चा ऐकायला मिळत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. आताच पाणीटंचाईने इतके उग्र स्वरूप धारण केले असून, उन्हाळ्यात पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे.नामपूरमध्ये पाणीटंचाईने कळस गाठला आहे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आता एखाद्या नगरालाही पुरेल इतकेही पाणी नाही. या दृष्टीने गावाला आता टँकरद्वारे पाणीपुरवठा हा एकमेव उपाय आहे. मध्यंतरी बागलाणच्या आमदारांनी नामपूरला पाण्यासंदर्भात बैठक घेतली होती; मात्र अद्याप कार्यवाही नाही. सरपंच प्रमोद सावंत, अशोक सावंत व इतर ग्रामपंचायत सदस्यांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. गावाला दररोज किमान १० टँकर पाणी मिळाल्यास पाणीप्रश्न काही प्रमाणावर सुटण्यास मदत होऊ शकते. नामपूरमध्ये १९७५साली असलेल्या ७५०० इतक्या लोकसंख्येला गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले होते. त्याकाळी इंदिरानगर या नामपूरला जोडून असलेल्या वस्तीत केवळ २०-२५ घरे होती. आज तिथे एकूण १४ नगरे आहेत. नामपूर गावही विस्तारले आहे; मात्र आजही नामपूरला १९७५ सालची कालबाह्य योजना पाणीपुरवठा करते आहे. ठोस व कायमस्वरूपी योजना राबविणे काळाची गरज आहे, अशी मागणी शिवराय ग्रुपचे स्नेहराज सावंत, अमोल पाटील, विकिराज सावंत यांनी केले आहे. रंजना मुथा या वॉर्डात दररोज दोन टँकर पाणी गेल्या पंधरा दिवसांपासून देत आहेत. तर जैन समाजाचे रमेश मुथा, सरपंच प्रमोद सावंत यांनी आपल्या विहिरीचे पाणी नामपूर गावास दिले आहे; मात्र हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(वार्ताहर)
नामपूर येथे पाणीटंचाई
By admin | Updated: February 15, 2016 23:58 IST