पंचवटी : विभागातील प्रभाग क्रमांक १, ५ आणि ६ या तीनही प्रभागांस गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत मनसे आणि भाजपाच्या चौघा नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रभातनगर जलकुंभाजवळ ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे, चार ते पाच दिवसांपूर्वीच मनसे नगरसेवक गणेश चव्हाण यांनी जलकुंभावर चढून आंदोलन छेडले होते. त्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून पाणीप्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या होत्या; मात्र त्यानंतरही पाणीप्रश्न ‘जैसे थे’ राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आंदोलनात पंचवटी प्रभागाच्या सभापती शालिनी पवार, सिंधू खोडे, रंजना भानसी व मनसे नगरसेवक गणेश चव्हाण आदि सहभागी आहेत. प्रभागात दोनवेळ पाणीपुरवठा करूनही पुरेसे पाणी येत नसल्याने एकवेळ पाणीपुरवठा करावा, असे सुचविण्यात आले होते. एकवेळचा पाणीपुरवठा करूनही पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांनी केल्याने संतप्त लोकप्रतिनिधींनी प्रभागातील नागरिकांसह जलकुंभाच्या खाली बसून ठिय्या आंदोलन केले. एकीकडे धरणातील जलसाठा वाढला असला, तरी नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने पाणीप्रश्न सोडविणार कोण, असा सवाल लोकप्रतिनिधींनी केला आहे. (वार्ताहर)
म्हसरूळ येथील पाणीप्रश्न पेटला
By admin | Updated: September 21, 2014 00:53 IST