नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही पर्वणीसाठी लाखो वारकरी नाशिकला दाखल होतील; परंतु सुमारे एक लाख वारकरी पर्वणीकाळात महिनाभर नाशिक मुक्कामी राहणार असल्याने त्यांच्या निवासासाठी शासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय वारकरी कुंभमेळा परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. रामकृष्ण लहवितकर महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. वारकरी संप्रदायाचे सात खालसे असून, निर्माही आखाड्यांतर्गत हे खालसे सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होत आले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अपेक्षांबाबत बोलताना रामकृष्ण लहवितकर महाराज यांनी सांगितले, साधू-महंतांसाठी उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामचा विषय अद्याप मार्गी लागलेला नाही. त्याबाबत जागेचा प्रश्न भिजत पडला आहे. साधुग्राममध्ये खालसांना जागा उपलब्ध करून दिल्या जातात परंतु वारकरी संप्रदायाच्या खालसांना छोटी जागा चालणार नाही. महाराष्ट्रात सुमारे दोन ते अडीच कोटी वारकरी आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक या प्रांतातूनही मोठ्या संख्येने वारकरी कुंभमेळ्यात शाही पर्वणीला येत असतात; परंतु पर्वणीकाळात सुमारे एक लाख वारकरी नाशिक क्षेत्री वास्तव्याला राहणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेत महिनाभर कीर्तन/प्रवचने तसेच ज्ञानेश्वरी-भागवत, गाथा, पारायणे आदि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आहे. शासनाकडून आळंदी-पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी फारशा काही सुविधा पुरविल्या जात नाहीत. वारकरी स्वत:च सुविधा उपलब्ध करून घेत आला आहे; परंतु शासनाने सिंहस्थात वारकऱ्यांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यात आरोग्य, चोवीस तास वीज, पाणीपुरवठा आदि सुविधांवर भर असावा. दुर्दैवाने प्रशासनाकडून त्याबाबत अद्याप कसल्याही हालचाली दिसून येत नाहीत. प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. संप्रदाय सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करत आला आहे. शासनाने वारकरी संप्रदायाला दुर्लक्षून चालणार नसल्याचेही लहवितकर महाराज यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाला कुंभमेळ्यात स्वतंत्र जागा मिळावी याबाबत आपण लवकरच पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे सांगत लहवितकर महाराज म्हणाले, यजमान म्हणून कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना जागा कशी उपलब्ध करून द्यायची, ही चिंता आम्हाला पडली आहे. वारकरी संप्रदायाला शासनाकडून कोणताही पैसा-आडका नको, फक्त मुबलक जागा आणि सुविधा पुरवाव्यात. गोदावरी प्रदूषणाचाही मुद्दा नेहमी चर्चेत असतो. त्याबाबतही महापालिका व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गोदावरीच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी देश-विदेशातून भाविक येतील, त्यांच्यासमोर आपल्या गोदावरीची खराब प्रतिमा जायला नको. मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने गोदावरी नदीवरील घाटाचेही विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागले पाहिजे. शाहीमार्ग हा पारंपरिकच असला पाहिजे. प्रामुख्याने हा प्रश्न साधू-महंतांशी चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच सोडवावा. वारकरी संप्रदायाचे सात खालसे निर्माेही आखाड्यांतर्गत कुंभस्नान करत असतात. ५२ द्वारांपैकी वारकरी संप्रदायाची नामदेव व ज्ञानदेव अशी दोन द्वारे आहेत. त्या द्वारांवर संप्रदाय स्नान करत असतो. वारकरी संप्रदायाचा तो अधिकारच आहे. प्रशासनाने निर्णय प्रक्रियेत वारकरी संप्रदायालाही सहभागी करून घेतले पाहिजे, असेही लहवितकर महाराज यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
वारकरी संप्रदायाला हवी स्वतंत्र जागा
By admin | Updated: July 22, 2014 00:57 IST