पाटोदा : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्याने घागरभर पाण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांवर रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासन पिण्याच्या पाण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.पिंपळगाव लेप हे दोन हजार लोकसंख्येचे गाव. गावातील नागरिकांना ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याने टंचाईत भर पडली आहे. गावात दोन विहिरी व सहा हातपंप आहे. यातील आदिवासी वस्ती, देवीमंदिर, स्मशानभूमी आदि हातपंपाला पाणीच येत नाही, तर हनुमान मंदिरजवळच्या हातपंपाला दूषित व कडूसर पाणी येते. या हातपंपाचे पाणीही दूषित असूनही ग्रामस्थांना नाईलाजास्तव हे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. नदीवरील बावडीस रात्रीतून चार-पाचशे लिटर दूषित पाणी येते या पाण्यावरच येथील ग्रामस्थ आपली तहान भागवत आहे. (वार्ताहर)
पाण्यासाठी भटकंती
By admin | Updated: March 19, 2016 23:51 IST