वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे गावात गेल्या तीन दिवसांपासून वीज गायब असून, नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल होऊ लागले आहेत. ऐन पावसाळ्यात वीज गायब होत आहे. वीज ट्रान्सफाॅर्मर वारंवार जळत आहेत. मात्र, महावितरण कर्मचारी याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत न दिल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
वाडीवऱ्हे बाजारपेठेचे मोठे गाव असून, या गावात सलग तीन दिवस वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना विजेअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तीन दिवसात तीन ट्रान्सफाॅर्मर जळाल्यामुळे पिण्याचे शुध्द पाणीदेखील मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
नागरिकांना अजून किती दिवस अंधारात काढावे लागणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अगोदरच कर्मचारी अपुरे असल्याने गैरसोय होत आहे. त्यात कमी दाबाचे वीज ट्रान्सफार्मर बसवल्याने ते वारंवार जळून जात आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे, लागत असल्याने ते संतप्त झाले आहेत.
गावातील पीठ गिरण्या बंद आहेत. मोबाईल चार्जिंग नाहीत. शुद्ध पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विजेअभावी फ्रिज बंद असल्याने व्यावसायिकाना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. महावितरण कार्यालयाने विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाकरिता रस्त्यावर उरण्याची तयारी ग्रामस्थांकडून केली जात आहे.