येवला : धुळगाव येथे वीजवाहिनी तुटून दोन बैल ठार, एक बैल गंभीर जखमी झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे एक लाखांचे नुकसान झाले. धुळगाव येथे गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मुख्य वाहिनीची तार तुटून जमिनीवर पडली. जमीन ओली असल्याने बैलांना विजेचा धक्का लागला. शेतकरी राहुल गायकवाड यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी बैलांना सोडवण्यासाठी धाव घेतली, मात्र वाहिनी प्रवाहित असल्याने काही करता आले नाही. यावेळी कुटुंबातील भास्कर गायकवाड व इतरांनी प्रसंगावधान राखून वाहिनीजवळ कोणीही गेले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. परिसरात वीज वितरणच्या जुनाट वाहिन्या बदलण्याची मागणीही केली. जखमी बैलावर येवला येथील पशुवैद्यकीय अधिकारी बावसकर यांनी तत्काळ उपचार केले. तलाठी शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वीज उपअभियंता श्रीमती फड रजेवर असल्याने त्या येऊ शकल्या नाहीत. लाईनमन परदेशी यांनी पाहणी केली. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली़ (वार्ताहर)
वीजवाहिनी तुटून धुळगावी दोन बैल ठार
By admin | Updated: September 9, 2016 00:21 IST