नायगाव : विविध नैसर्गिक संकटांना तोंड देत पिकविलेला कांदा यंदा केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे बाजार समितीत कवडीमोल किमतीत विकावा लागला. निर्यातबंदी केल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. आता शेतकऱ्यांकडील कांदा चाळीत नासून गेला व संपल्यानंतर निर्यातबंदी उठवल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य वाढवितानाच त्याची रवानगी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत केल्याने सध्या शेतकऱ्यांचे अच्छे दिन येण्याचे स्वप्न भंगलेच, परंतु ‘बुरे दिन’ आल्याची अनुभूती येऊ लागली आहे. देशात थेट इजिप्तहून कांद्याची आयात करून त्यावर कडी करण्यात आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतींमध्ये चढउतार होत होते. कांद्याचे उत्पादन कमी झाले अथवा परदेशातील मागणी वाढल्यावर निर्यात वाढली की त्यांचे दर वाढत होते. त्यातून काही शेतकऱ्यांचा फायदा होत होता. त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या ‘अच्छे दिन आनेवाले है’ या घोषणेमुळे देशभरातील अन्नदात्याने त्यांच्या झोळीत मतांचे दान टाकले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आता चांगले खरोखरच चांगले दिवस येतील, शेतमालाला चांगले दर मिळतील, दोन पैसे खिशात खुळखुळू लागतील, मुला-बाळींचे लग्न करता येतील, कर्जाचा बोझा कमी होण्यास मदत होईल, शेतात प्रगती करता येईल अशी भाबडी स्वप्ने पहाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र घोर निराशा पडली आहे. मोदी सरकारने कृषी प्रधान देशातील पिकविणाऱ्या गरीब अन्नदात्याचे हित पहाण्याऐवजी शहरी नागरिकांचे हित जोपासल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे अन्नदात्याला ‘चांगले’ दिवस येणे दूरच मात्र वाईट दिवसांचा सामना करण्याची वेळ आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे गावागावांध्ये बोलले जात आहे. देशात सर्वाधिक संख्या शेतकऱ्यांची आहे. शहरातील नोकरदारवर्गामध्येही अनेक शेतकऱ्यांची मुले आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या कारखान्यातून तयार होणारे व शेतकऱ्यांना विक्री करणारे बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, शेती औजारे यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या एकाही मालाला बाजारात समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र सत्ताधारी व विरोधी असे कोणतेही राजकीय नेते शेतकऱ्यांच्या बाजूला उभे राहत नसल्याने ‘कोणी न्याय देईल का, न्याय?’ अशी आर्त हाक बळीराजा देऊ लागला आहे. (वार्ताहर)
केंद्राच्या धोरणामुळे बळीराजा त्रस्त
By admin | Updated: September 2, 2014 01:11 IST