पंचवटी : वेद शिकण्यासाठी अधिकाराच्या पायऱ्या आहेत. वेदानुसार आपण आचरण करायला पाहिजे. वेदात काय आहे हे आपल्याला इतरांना सांगता आले पाहिजे आणि वेदांचे आचरण हे जनकल्याणासाठी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विद्यानृसिंह भारती यांनी केले. काळाराम मंदिर येथील वेदाध्ययन, अध्यापन, संस्कृती संवर्धन व जनकल्याणार्थ सक्रिय असलेल्या महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या १२व्या वर्धापनिदन निमित्ताने श्रीराम उपवन येथे महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान या निवासी वेदपाठशाळेचा तप:पूर्ती महोत्सव विश्वकल्याणार्थ त्रिदिवसीय श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञाला रविवारी सकाळपासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी शंकराचार्य यांनी सांगितले की, रक्तातील गुणांमुळे परिपूर्तता प्राप्त होते. मनुष्याने धर्मव्यवस्थेतील व्यवस्थेनुसार वागावे, धर्मासाठी आपण झटले पाहिजे. राज्यकर्त्यांनीदेखील धर्माला पूर्णपणे आश्रय दिला पाहिजे, असे ते शेवटी म्हणाले. सकाळी आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे ‘संतांची वेदनिष्ठा’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, खासदार हेमंत गोडसे, बाळासाहेब सानप, महेंद्र पोद्दार, राहुल ढिकले, प्रदीप बूब, बाळासाहेब पाठक, विपूल पोद्दार, विजय भातांब्रेकर, दामोदर देवरे, दत्ता ढिकले, सुनील चौधरी, किरण गोरवाडकर आदि उपस्थित होते. या महायज्ञानिमित्त सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्र म सुरू राहणार असून, भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक दत्तात्रय पैठणे, रवींद्र पैठणे, पत्रकार विश्वास देवकर, प्रकाश जोशी, गोविंद पैठणे, वामन गायधनी, धनंजय बेळे, नंदकुमार हरदास आदिंसह महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)
जनकल्याणासाठी वेदांचे आचरण होणे आवश्यक
By admin | Updated: April 3, 2017 01:49 IST