बेलगाव कुऱ्हे : दुष्काळी स्थितीत पाण्याविना होणारी पक्ष्यांची तडफड पाहून इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील मधुकर पिचड आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा परिणामकारक वापर करून पक्ष्यांसाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी परिसरातील रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे संकलन करून पशु पक्ष्यांची तहान व भूक भागविण्याचा प्रयत्न केल्याने या विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी परिसरातील प्रत्येक झाडावर त्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आश्रमशाळा परिसरात शेकडो पक्षी दररोज पाण्याच्या शोधासाठी येत असतात. त्यांना पाणी मिळत नसल्याने चिवचिवाट करून माघारी फिरत त्यांची स्वारी पूर्व दिशेला असणाऱ्या नदीपात्राकडे जाते तर कधी धरणाकडे; मात्र तिथेही पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने त्यांना माघारी परतावे लागत असावे. काही दिवसांत त्यांचा किलबिलाट नाहिसा झाल्याची चिमुकल्या मुलांना कल्पना येताच त्यांनी शिक्षकांना सांगितले. यातून शिक्षकांनी हा उपक्रम राबविला. परिसरातील झाडांवर सकाळ-संध्याकाळी या बाटल्यांमध्ये पाणी भरून ठेवतात. या स्तुत्य उपक्र मामुळे शेकडो पक्षी दररोज पाणी पिऊन जातात. त्यांच्याबरोबर पाहुण्या पक्ष्यांचीदेखील संख्या आता वाढत आहे.तालुक्याच्या पूर्वभागातील कवडदरा येथे पाण्याचे संकट हे नेहमी पाचवीलाच पूजलेले असते. थेंबभर पाण्यासाठी महिलांचा नेहमीच आटापिटा असतो, असे असताना पक्ष्यांचा विचार कोण करणार? तेही आपल्यासारखेच जीव आहेत. त्यांनाही जीवन आहे, हा विचार मनात आला आणि शिक्षकांच्या मदतीने आज पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या शेकडो पक्ष्यांना थेंबभर पाण्याचा आधार मिळाला आहे.अनेक पक्ष्यांना पाणी व अन्न मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी ही नामी शक्कल लढवत शालेय परिसरात निरु पयोगी अवस्थेत कचरा बनलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करत पाणी व अन्नाची व्यवस्था केली. यानंतर बनविलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी व अन्न म्हणून धान्य टाकून झाडावर ठेवण्यात आले. या उपक्र मात कृष्णा गवारी, किरण पडवळे, ऋतिक भले, विठ्ठल मेंगाळ, जयराम गांगड, आकाश रण, मोहन बेंडकुळे, माधव पवार, अक्षय साबळे, परवेश पिंगळे, कार्तिक खोकले, संपत हिंदोळे, अजय जाधव, अजय हिंदोळे आदि विद्यार्थी सहभागी होते. पाण्याचे घटते प्रमाण चिंताजनक असून, पशुपक्ष्यांवर दाही दिशा भंटकण्याची वेळ आली आहे.प्रत्येक झाडावर अनेक पक्ष्यांचे थवे मानवाकडून काहीतरी अपेक्षा धरून बसलेले असतात. मनुष्य वस्तीतील व्यक्ती त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यास असमर्थ ठरतात.(वार्ताहर)
रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या उपयोग
By admin | Updated: April 10, 2017 01:20 IST