नाशिक : येत्या १५ आॅगस्टनंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चेने सर्वसाधारण सभा ही १० किंवा ११ आॅगस्टलाच घेण्यात यावी, या मागणीचे पदाधिकारी व सदस्य असलेल्या २३ जणांचे स्वाक्षरीचे पत्र गुरुवारी सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आले. त्यामुळे अध्यक्षांनी २० आॅगस्टची तारीख दिल्याने सभा नेमकी कधी घ्यावी, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे.उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह सभापती राजेश नवाळे, सुनीता अहेर व अन्य भाजपा, सेना, माकप अशा सर्वपक्षीय २० अशा एकूण २३ जणांनी सर्वसाधारण सभा लवकर घेण्याची मागणी करण्याचे लेखी पत्रच प्रशासनाला दिले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अधिनियमात एकूण सदस्यांपैकी एक पंचमांश सदस्यांनी मागणी केल्यास सर्वसाधारण सभा घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो अध्यक्षांकडे पाठविण्याची तरतूद आहे. त्याच नियमाचा आधार घेऊन सर्वसाधारण सभा घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. आता अध्यक्षांनाही नियमानुसार सभेबाबतचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.त्यातही जिल्हा परिषदेत आजवर सर्वपक्षीय सदस्य एकवटले जात नसल्याचे चित्र असतानाच निधी खर्च होणार नाही, आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून सर्वसाधारण सभा लवकरात लवकर घेण्याच्या मागणीसाठी प्रथमच ही स्वाक्षरी मोहीम या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राबविण्यात आल्याने त्याबाबत चर्चा सुरू आहे. आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे या २३ सदस्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)