नाशिक: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक शाखेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती, तसेच मतदार यादी पडताळणीची मोहीम राबविली जाते. जास्तीतजास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, यासाठी प्रचार-प्रसारही केला जातो. असे असले, तरी जिल्ह्यातील मतदानाचा टक्का जेमतेम वाढल्याचे दिसते. सन २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची टक्केवारी पाहिली, तर मतांची टक्केवारी फार मोठी वाढली, असे दिसत नाही.
मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविली जाते, याशिवाय नवमतदारांनाही मतदार यादीत सामाविष्ट करण्यासाठीची विशेष मोहीम घेतली जाते. पोस्टर्स, बॅनर्स, जिंगल्स, तसेच ऑडिओ, व्हिडीओच्या माध्यमातून मतदारांना हक्काची जाणीव करून दिली जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, तुलनेत मतदानाची टक्केवारी फारशी वाढली नाही.
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या २०१४च्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी ६१.६८ टक्के इतकी हेाती, तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतांची टक्केवारी ६२.२५ इतकी राहिली. अशीच काहीशी परिस्थिती विधानसभेला देखील दिसून आली. २०१४च्या विधानसभेची टक्केवारी ६६.८९ टक्के इतकी होती, तर २०१९ मध्ये मतांची टक्केवारी ५९.५४ इतकी राहिली. (डमी)