पाण्याचा वाद : नवीन घाट पाण्याविनानाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचून न्यायालयाने पाणी काटकसरीने वापरण्याचे निर्देश दिल्यामुळे येत्या २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील तिसऱ्या व अंतिम पर्वणीसाठी भाविकांना थेट कुशावर्तात स्नानाची संधी प्रशासनाकडून दिली जाणार आहे. अहल्या धरणावर बांधण्यात आलेल्या तिन्ही घाटांंवर स्नानासाठी पाणी सोडण्यास त्र्यंबक नगरपालिका अनुत्सुक असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. गत दोन्ही पर्वणीच्या काळात कुशावर्तात स्नानासाठी होणारी भाविकांची गर्दी पाहून अहिल्या धरणाचे काही दरवाजे उघडून प्रशासनाने घाटांवर स्नानासाठी पाणी खेळते ठेवले होते, परंतु भाविकांनी घाटांकडे पाठ फिरवित कुशवर्तातच स्नानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे दोन्ही पर्वणींचा अनुभव पाहता तिसऱ्या पर्वणीला मुळातच भाविक कमी येतील अशी आशा प्रशासनाला असून त्याचाच आधार घेऊन अहिल्या धरणातून तिसऱ्या पर्वणीला पाणी न सोडण्याचे नगरपालिकेच्या विचाराधिन आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या दिवशी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येऊन त्याची नुकतीच सुनावणी झाली, त्यात पाटबंधारे खात्याला न्यायालयाने विचारणा केली. परंतु नाशिकच्या तिन्ही पर्वण्या आटोपल्यामुळे आता गंगापूर धरणातून कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फक्त त्र्यंबकेश्वरची अंतिम पर्वणी २५ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यासाठी कोठून पाणी सोडणार असा प्रश्नही न्यायालयाने विचारलेला आहे. त्यावर त्र्यंबक नगरपालिका आपले म्हणणे मांडणार आहे.
त्र्यंबकच्या पर्वणीला कुशावर्तातच स्नान
By admin | Updated: September 22, 2015 23:56 IST