गोकुळ सोनवणे सातपूरवेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठी सातपूर येथील ट्रायकॉम इंडिया कंपनीतील कामगारांनी सीटू युनियनच्या नेतृत्वाखाली २४ दिवसांपासून संप पुकारला आहे. या संपाला कंपनी व्यवस्थापनाने ‘टाळेबंदी’ जाहीर करून उत्तर दिले आहे. कामगार उपआयुक्त कार्यालयात अनेकवेळा बैठका होऊनही अपेक्षित मार्ग निघालेला नाही. दिवाळीसारखा सण अंधारात गेल्याने त्रासलेल्या आणि वैतागलेल्या कामगारांनी आमचा हिशेब चुकता करावा आम्ही दुसरीकडे नोकरी शोधू अशा भावना व्यक्त केल्या आहेत, तर कामगार उपआयुक्त कार्यालय, ग्राहक आणि कामगार यांच्या त्रासामुळे कंपनी सुरू ठेवणे अवघड असल्याची भावना कंपनी संचालकांनी व्यक्त केली आहे. सोमवार (दि. १६) पासून टाळेबंदी घोषित केल्याने आणि या वेगवेगळ्या भूमिकांमुळे ट्रायकॉम इंडिया हा आयटी उद्योग अल्पायुषी ठरण्याची शक्यता उद्योग वर्तुळात चर्चिला जात आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीत २००७ साली ट्रायकॉम इंडिया नावाचा आय. टी. उद्योग सुरू झाला. त्यावेळी कामगारांना अडीच हजार रुपये दरमहा वेतन दिले जात होते. २०१३ पर्यंत ७५०० रुपये ते ६८०० रुपये वेतन मिळू लागले. २०१२ साली कामगारांनी दिवाळीत संप पुकारला तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी लागलीच दखल घेऊन कंपनीत धाव घेतली. यशस्वी मध्यस्थी केल्याने कामगारांनी संप मागे घेतला होता. किमान वेतनदेखील मिळत नसल्याने या कामगारांनी २०१३ साली सीटू युनियनचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर या युनियनने किमान वेतनाची मागणी केल्यानंतर दोन हजार रुपये इन्क्रिमेंट व्यवस्थापनाने कामगारांना दिल्याने कामगारांना ८८०० रुपये वेतन मिळू लागले. २०१४चा दिवाळी बोनस मिळावा म्हणून कामगारांनी मार्च २०१५ मध्ये पुन्हा संप पुकारला.
ट्रायकॉममध्ये आजपासून टाळेबंदी
By admin | Updated: November 16, 2015 00:01 IST