सटाणा : शासन एकीकडे वृक्षसंवर्धनासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे मात्र वनखात्याची परवानगी नसतानाही रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तब्बल सव्वीस डेरेदार वृक्षांची कत्तल केल्याचा प्रकार सटाण्यात उघडकीस आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या या कारनाम्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.सटाणा ते शेमळी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बांधकाम विभागाकडून सहा कोटी ३० लाख रु पये मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, चिंच, निंब, बाभूळ, आंबा आदिंची मोठ्या प्रमाणात डेरेदार वृक्ष उभी आहेत. याला परिसरातील दोन पिढ्या नक्कीच साक्षीदार आहेत. सध्या या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, कामाला अडथळा येतो म्हणून बांधकाम विभागाच्या अभियंत्याने सटाणा वनविभागाकडे सुमारे १७ डेरेदार वृक्षांची शासकीय किंमत काढून, तोडण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी क्षेत्रपरीक्षण करून पैकी दहा झाडांना तोडण्याची परवानगी दिली. मात्र असे असताना बांधकाम विभागाचे अभियंता आणि लाकूड ठेकेदार यांनी संगनमत करून अक्षरश: सर्वच वृक्षांची कत्तल करण्याचा सपाटाच लावला आहे. रात्री-पहाटे या झाडांची बुंध्यासह कटाई सुरू केली आहे. वनविभागाचे नियम धाब्यावर बसवून सव्वीस झाडांची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुलाशानंतर हा प्रकार उघडकीस आला.(वार्ताहर)
रुदीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 23:48 IST