२०० हेक्टरच्या गायरानावर वृक्षतोडीचे संकट
घनदाट जंगल ओस पडू लागले आहे. एकीकडे शासनाकडून वृक्षांची लागवड केली जाते. मात्र, दुसरीकडे असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन करण्याच्या कामाबाबत दुर्लक्ष केले जात असून मोठ्या प्रमाणात नवीबेजसारख्या गावात गायरानमध्ये वृक्षतोड करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वृक्षतोड होत असल्यामुळे आता राहिलेली वनसंपदाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वारंवार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे या भागात असणारे नैसर्गिक सौंदर्य हरविले जात आहे. नवीबेज गायरान २०० हेक्टरचे असून वनसंपदा ही सामाजिक वनीकरण विभागाकडे संरक्षणासाठी ताब्यात आहे. गायरान जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. मात्र, वनसंपदेची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्यामुळे या भागात नष्ट होत चाललेल्या निसर्गाचे संगोपन करणे गरजेचे आहे.