भगूर : रेल्वेगाडीखाली सापडून एका तरसाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी उशिरा येऊन तरसावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, सकाळी घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यासंदर्भात वनविभागाला कळविल्यानंतरही कर्मचारी उशिराने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वनकायद्यानुसार पंचनामा करीत तरसावर अंत्यसंस्कार केले. वनविभाग उशिरा घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. आर्टिलरी सेंटरच्या नजीक असलेल्या दाट जंगलातून तरस रेल्वेलाईनलगत आले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. (वार्ताहर)