गणेश धुरी जिल्हा मिनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोेन्नत्या म्हटल्या की, अर्थपूर्ण घडामोडीही आल्याच म्हणून समजायच्या. त्यातल्या त्यात मे महिन्यात तर बदल्या करण्यासाठी आणि टाळण्यासाठी अशा इच्छुकांचा दरवर्षी मेळाच भरत असतोे. याही वर्षी थोड्या फार फरकाने बदल्यांची जत्रा भरलीच. मात्र ती काहीअंशी थोपविण्यात नवनियुक्त शिपे-सालेदार सुखदेव बनकर यांना यश आले. मात्र अंशत:च्या नावाखाली आता सोयीच्या ठिकाणी बदल्या करण्याचा अर्थपूर्ण ‘खेळ’ही रंगल्याचे लपून राहिले नाही.बदल्या आणि पदोन्नत्या ही तशी पाहता सर्वस्वी प्रशासकीय बाब असली तरी आजवर याच बदल्यांमध्ये आणि पदोन्नत्यांमध्ये नको तितके पदाधिकाऱ्यांनी नाक खुपसण्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत, येत आहेत आणि भविष्यातही येतील, हे सांगणे नको. अगदी व्यवस्थित आणि पारदर्शक बदल्या केल्यानंतर खरे म्हणजे सोेयीच्या आणि अंशत: बदल्यांची तसे पाहता गरज राहता कामा नये. मात्र प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्य असलेल्या काहींना ते चुकचुकल्यासारखे वाटते. म्हणूनच बदल्या आणि पदोन्नत्यांची कार्यवाही सुरू झाली रे झाली की, कर्णापकर्णी निरोप वजा अर्थपूर्ण सूचना इच्छुकांकडे पाठविल्या जातात. तसे भोळेभाबडे कर्मचारीही त्याला कसे काय भुलतात, हाही एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण बदल्यांच्या कार्यवाहीत हमखास प्रशासनाकडून दरवेळी बदल्यांसाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणाशीही संपर्क साधू नये, असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आले असले तरी कर्मचारी सोयीच्या बदल्यांसाठी हमखास पुढाऱ्यांची आणि काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची दारे अन् उंबरठे पुजतात म्हणजे पुजतात. बरे ज्यांच्या सोयीने बदल्या होणार आहेत, असेही कर्मचारी नेमके पुढाऱ्यांच्या गळाला कसे लागतात, हाही तसे पाहता संशोधनाचा विषय आहे. आताही अंशत: बदल्यांच्या नावाखाली चार-दोन कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यासाठी सांगावा पाठविण्यात आला खरा; मात्र हा सांगावा प्रशासनातील काही धूर्त झारीतील शुक्राचार्यांनी कांगावासारखा सर्वांना निरोप धाडला. जिथे चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करायच्या होत्या, तिथे चाळीस कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले आणि प्रत्यक्षात चाळीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब जिल्हा परिषदेत हजेरी लावली. त्यामुळे जिल्हा परिषदेत अंशत: बदल्यांची जत्राच भरली होती. यातही एका कर्मचारी पुढारी ‘सेविकेने’ म्हणे अंशत: बदल्यांसाठी अन्य सेविकांकडून पाच- पन्नासचा पाला-पाचोळा गोळा केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत जोर धरू लागली आहे. या सेविकेला एका पुढाऱ्याने आपल्या वाक्‘बाणाने’ मदत केल्याचीही कर्णाेपकर्णी चर्चा जिल्हा परिषदेत रंगू लागली आहे. याला आणखी जोड म्हणून प्रशासनातीलच काही शुक्राचार्य त्यांना फळास आल्याचे बोलले गेले. आता नेमक्या या अंशत: बदल्या होतील की नाही, हा भाग अलाहिदा असला तरी या बदल्यांच्या नावावर गोळा झालेला मलिदा मात्र आतापर्यंत सफाचट झाला असेल, यात शंका नाही. यालाच आता सुखदेव बनकरांनी आळा घातला पाहिजे. मात्र बनकर सर्वांचे ‘मन’ राखण्यातच धन्यता मानत असल्याने त्यांनीही आता कणखर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. चार-दोन कर्मचाऱ्यांना बोलविणे आणि चाळीस कर्मचाऱ्यांनी गोळा होणे, हे वास्तविक पाहता संशयाला बळकटी देण्याचे ‘चित्र’ त्यांच्या प्रामाणिक ‘दृष्टीआड’ झालेच कसे, हेही त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. मागच्यास ठेच, पुढचा शहाणा, ही म्हण आत्मसात करून सुखदेव बनकर यांनी आता तरी पदोन्नतीसह विशेष बाब म्हणून आलेल्या बदल्यांबाबत कठोर तपासणी करून नंतरच त्या विभागीय आयुक्तांच्या मंजुरीस पाठविणे आवश्यक आहे. आता तरी बनकर धडा घेतील काय, हाच खरा मूळ प्रश्न आहे.
बदल्यांची जत्रा, तिथे कारभारी सतरा
By admin | Updated: June 9, 2014 00:43 IST