नाशिक : राज्यातील टोलवसुली विरोधात आंदोलन छेडणारे मनसेचे राज ठाकरे यांनी ४४ टोलनाके बंद केल्यानंतरही नाराजी व्यक्त केली असून, यापूर्वी बंद करण्यात आलेले ६५ टोलनाके कोणते होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. जोपर्यंत आघाडी शासन टोलविषयी पारदर्शक धोरण जाहीर करीत नाही तोपर्यंत टोलचा प्रश्न सुटलेला नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. नाशिक दौऱ्यावर आले असता राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. गेल्या दीड वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांशी टोलप्रश्नी तीन वेळा भेट घेतल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले, आघाडी शासनाने टोल धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पूर्वी ६५ आणि आता ४४ टोलनाके बंद केल्याचे सरकार जाहीर करीत असेल, तर राज्यात किती टोलनाके आहेत याची माहिती नको द्यायला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.