नाशिक : मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात आॅगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात सोमवार, दि. ७ जुलैपासून होत आहे. पालिकेचे हे मिशन पाणीबचाव धरणात वाढणाऱ्या पाणीसाठ्यापर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, एकवेळ पाणीपुरवठ्याची तयारी पालिका प्रशासनाने पूर्ण केली आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी कमी पाऊसमानाचे संकट लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला उपलब्ध पाणीसाठ्यासंबंधी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला असून, सोमवार, दि. ७ जुलैपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रक निश्चित केले आहे. वेळापत्रकानुसार शहरातील काही भागात सकाळी, तर काही भागात सायंकाळी पाणीपुरवठा केला जाणार आहे. सिडको, पंचवटी, गांधीनगर परिसरातील काही भागात तर रात्री १२ ते पहाटेपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन असल्याने नागरिकांना पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. काही भागात सकाळी ९ वाजेनंतर पाणीपुरवठा होणार असल्याने नोकरदारांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे, तर ज्या भागात यापूर्वी एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे तेथे कोणत्याही प्रकारची पाणीकपात राहणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. गंगापूर धरणात सध्या १९९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून, आॅगस्टपर्यंत पुरेल इतकाच साठा आहे. या पाणीकपातीमुळे रोज सुमारे ६० दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. सध्या रोज ४०० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)४पावसाने ओढ दिल्याने उद्भवणारे पाणीसंकट टाळण्यासाठीच महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व पाणी जपून वापरावे. पिण्याच्या पाण्याचा कपडे अथवा वाहन धुण्यासाठी वापर करू नये. पाणीबचतीसंबंधी महापालिकेने जाहिरात फलकांमार्फत नागरिकांचे प्रबोधन चालविले आहे. नागरिकांनी पाणीबचतीसाठी महापालिकेला सहकार्य करावे. - अॅड. यतिन वाघ, महापौर