आनंद खरे
आज शेवटच्या जी आणि एच या दोन गटातील चार लढती होत आहेत. जी गटातील पोर्तुगाल-घाना ही लढत दोघांसाठीही करो या मरोचीच असणार आहे. कारण या दोघांच्याही नावावर केवळ बरोबरीचा १-१ गुण आहे. या सामन्यातील विजयी संघाचे ४ गुण होतील, तर अमेरिकेचे याआधीच ४ गुण असल्यामुळे अमेरिका हरली आणि गोल फरक जास्त राहिला तरच या दोन्हीही संघांपैकी जिंकणाऱ्या संघाला संधी आहे. अमेरिकेची बरोबरीही या दोघांच्याही पुढील वाटचालीला पूर्णविराम देणारी ठरेल. अमेरिकेचा सामना जर्मनीशी होणार आहे. त्यामुळेच या दोघांनाही जर्मनीच्या विजयाचीच आस धरावी लागेल. एच गटातील अल्जेरिया-रशिया आणि बेल्जियम-कोरिया या दोन लढतीत बेल्जियम अंतिम १६ मध्ये पोहोचलेला आहे. उर्वरित तीनही संघांपैकी रशिया आणि कोरिया यांना केवळ विजय मिळाल्यासच त्यांची धुगधुगी कायम राहू शकते, कारण अल्जेरियाची बरोबरी या दोघांचाही हिशोब संपवू शकते. त्यामुळे वरीलप्रमाणे या दोघांनाही बेल्जियमच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल हे नक्कीच. डिएगगो गोडीनमुळे उरुग्वे इन; कोलंबिया-ग्रीसचेही आगमन२० व्या विश्वचषकाच्या गटवार साखळीच्या अ, ब, क आणि ड या चार गटांचे शेवटचे साखळी सामने संपल्यामुळे गटांचे चित्र स्पष्ट झाले आहे. परवा नेदरलॅन्ड या युरोप संघाबरोबर यजमान ब्राझील, चिली आणि मेक्सिको या दक्षिण आणि उत्तर अमेरिकन संघांनी बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला होता. कालच्या महत्त्वाच्या सामन्यात उरुग्वे या आणखी एक अमेरिकन संघाने प्रवेश मिळवत चार वेळच्या विश्वविजेत्या इटली संघाला घरचा रस्ता दाखवला, तर कोलंबिया या अमेरिकन संघानेही आपल्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत संपूर्ण ९ गुणांसह अंतिम १६ मध्ये प्रवेश करून आपले पुनरागमन साजरे केले. काल खेळलेल्या क आणि ड या दोन गटांतील सर्वांची उत्सुकता लागलेली होती ती उरुग्वे-इटली या सामन्यावर. कारण ग्रुप आॅफ डेथमधील या अंतिम सामन्याच्या निकालावर दोघांचेही भवितव्य अवलंबून होते. या सामन्याआधी दोघांच्याही खात्यात ३-३ गुण जमा होते, मात्र गोल सरासरीच्या आधारावर पुढे असल्यामुळे इटलीला या सामन्यात बरोबरीही चालण्यासारखी होती; परंतु उरुग्वेला विजय मिळाला तरच त्याचा पुढील प्रवास सुरू राहणार होता. या पार्श्वभूमीवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हे गणित डोक्यात ठेवूनच या दोघांचाही खेळ होत होता हे दिसून आले. इटलीला गोल करण्यापेक्षाही गोल आडवणे महत्त्वाचे झाल्यामुळे त्यांनी आपला भरवश्याचा खतरनाक स्टायकर मारिओ बालातोली यालाही मध्यपंक्तीत खेळवले, ही जागा फारशी आवडीची नसल्यामुळे त्याच्याकडून चुका होत होत्या. परिणामी त्याला पिवळे कार्डही मिळाले आणि आणखी रिस्क नको आणि आघाडीपेक्षा बचाव मजबूत करण्याच्या हेतुने इटलीचे प्रशिक्षक सिझार प्रांडेली यांनी बालाटोलीला २०व्या मिनिटालाच बाहेर काढून घेतले. विजय आवश्यक असल्यामुळे उरुग्वेकडून गोल करण्यासाठी वारंवार हल्ले तर बचावासाठी इटलीचे प्रयत्न आणि जमल्यास प्रतिआक्रमण असे चित्र वारंवार दिसत होते. उरुग्वेच्या सुआरेस, रॉड्रिगेस यांचे हल्ले इटलीचा अत्यंत अनुभवी गोलकिपर गीयानलुका बुफॉन याने आपला तमाम अनुभवाच्या आधारे यशस्वीपणे परतावून लावले. पहिले सत्र कोरे गेल्यावर दुसऱ्या सत्रातही पहिली १५ मिनिटे हीच स्थिती होती. मात्र या सामन्याचे पंच मार्को रॉड्रीगेस यांनी इटलीचा क्लाउडी मार्चिसी याला रेड कार्ड दिले, त्यामुळे त्यांना १० खेळाडूनिशी किल्ला लढवावा लागला. तरीही अनुभवी गोलीने उरुग्वेला थोपवून धरण्यात यश मिळवले. मात्र एका कॉर्नरच्या कॉसवर ही कोंडी फुटली आणि उरुग्वेचा बचावपटू डिएगगो गोर्डीने या कॉर्नर किकचा सुरेख अंदाज घेत हेडरद्वारे चेंडूला जाळ्यात पाठवले आणि हाच गोल उरुग्वेला पहिल्या १६ मध्ये दाखल करण्यात कारणीभूत ठरला, तर मागील विश्वचषकाप्रमाणे याही विश्वचषकामध्ये गटातच गारद होण्याची वेळ चार वेळच्या विश्वचषक विजेत्या इटलीवर आली आणि स्पेन, इंग्लंड, युरोपच्या माजी विश्वचषक विजेत्यांच्या पगंतीत जावे लागले. या सामन्यात उरुग्वेचा विजय झाला असला आणि नियमाप्रमाणे उरुग्वेपुढे गेला असला तरी त्याचा महत्त्वाचा खेळाडू लुईस सुआरेजच्या अखिलाडू वृत्तीमुळे उरुग्वेला मान खाली घालावी लागली आणि ही उरुग्वेची हार आहे हे नक्कीच. ग्रीस-आयव्हरी कोस्टा या सामन्यातही चांगलाच क्लायमॅक्स बघायला मिळाला. कोस्टा या आफ्रिकी संघाला पुढील वाटचालीसाठी केवळ बरोबरी आवश्यक होती, तर ग्रीसला विजयच आवश्यक होता. ९० मिनिटांपर्यंत बरोबरी असल्यामुळे कोस्टाचा प्रवास पुढे सुरू राहील, असे वाटत असतानाच या सामन्याचे पंच कार्लोस व्हीएरा यांनी ग्रीसला पेनल्टी बहाल केली. या पेनल्टीच्या गोलमुळे आयव्हरी कोस्टाला पराभवाचे धनी व्हावे लागले आणि स्पर्धेबाहेरही पडावे लागले, तर २००४च्या युरोचषक विजेत्या ग्रीसला या एकमेव विजयामुळे पुढे जाण्याची संधी मिळाली. म्हणूनच कोणत्याही खेळामध्ये तंत्र आणि आपली क्षमता यालाच महत्त्व असले तरी आपल्या नशिबानेही साथ देणे आवश्यक असावे लागते याचीही प्रचिती आली.