येवला : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जब्रेश्वर शाखेसह अन्य शाखांकडून येवला तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचे हक्काचे पगार गेल्या चार महिन्यांपासून दिले जात नसल्यामुळे तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, शुक्र वारपर्यंत पगार झाले नाही तर शनिवारी (दि. १५) येथील जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह जब्रेश्वर शाखेला कुलूप ठोकण्याचा एकमुखी निर्णय येथील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर यांच्या समन्वय समितीच्या सभेत घेण्यात आला. शासनाच्या जिल्हा कोशागारातून जिल्हा बँकेत पैसे जमा होतात; परंतु जिल्हा बँकेकडून पगाराचे पैसे मिळत नाहीत. वेतन आल्यावर आपला पैसा इतरत्र वळविला जातो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी समन्वय समितीची बैठक शनिवारी येथील एन्झोकेम विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चांगदेव कुळधर होते.सर्वांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहावे. यासाठी आंदोलनाचे हत्त्यार उपसावे. एप्रिल महिन्यापासून जिल्हा बँकेत पगाराचे पैसे ट्रेझरीतून जिल्हा बँकेत देऊ नये यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे, असा सूर बैठकीत राजेंद्र गायकवाड, अण्णासाहेब काटे, एम. पी. गायकवाड, दिगंबर नारायणे, दत्तकुमार उटावळे, माणिक मढवई, आर. के. जाधव, दत्ता महाले, रईस शेख, आर. टी. खैरनार, जावेद अन्सारी, रामदास कहार, दौलत वाणी, आर. आर. थळकर आदिंनी लावला. वेतन अदा न केल्याने एन.डी.सी.सी. बँकेने फसवणूक केल्याची शिक्षकांची भावना झाली आहे. (वार्ताहर)येवल्यातील माध्यमिक शिक्षकांचे येथील एन.डी.सी.सी बँकेच्या विविध शाखेत खाते असून दरमहा शिक्षकांच्या पगाराची रक्कम या बँकेत वर्ग करण्यात येतात.प्रत्येक मिहन्याचे वेतन सुमारे तीन ते साडेतीन कोटी रु पये खात्यावर वर्ग केली जाते.पैसे काढायला गेल्यानंतर मात्र बँकेत पैसे नसल्याचे सांगण्यात येते. गेल्या दोन मिहन्यात भिकेसारखे तुटपुंजे पैसे देण्याचे बँकेचे धोरण शिक्षकांनी सहन केले.परंतु आता शिक्षक संतप्त झाले आहे.बँकेच्या हजार, पाचशे च्या जुन्या नोटांचा प्रश्न, तसेच कर्जमाफी चर्चेमुळे शेतकरी कर्ज भरत नसल्याने एनडीसीसी बँकेकडे ठेवींचा, रकमेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.असे संचालक किशोर दराडे यांनी सांगितले. तरीही यावर मार्ग काढत बुधवार पर्यंत कुठल्याही परिस्थितीत शिक्षकांचे वेतन अदा केले जाईल असा शब्द दराडे यांनी दिला होता.तो शब्द खरा ठरतो काय याची वाट बुधवार पर्यंत पाहण्याचा निर्णय बैठकीत झाला.वेतनाची रक्कम वर्ग न केल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.वेतन न मिळाल्यास शनिवार १५एप्रिल रोजी बॅँकेच्या दोन्ही शाखेला कुलूप लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
चार महिन्यांपासून पगार थकले
By admin | Updated: April 10, 2017 01:08 IST