शैलेश कर्पे
सिन्नरआमदार माणिकराव कोकाटे यांनी राजकीय निर्णय घ्यावा, असे विधान बारागावपिंप्री येथील जाहीर कार्यक्रमात करुन गुगली टाकणारे पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ आणि तोच धागा पकडून पक्षांतराच्या मुद्द्यावर चौफेर फटकेबाजी करणाऱ्या आमदार माणिकराव कोकाटे यांच्या भाषणबाजीमुळे श्रोत्यांनाही या उभयतांचा राजकीय प्रवासाचा गुंता कोड्यात टाकून गेला. कॉँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे सभापती असतानाही बाळासाहेब वाघ यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करीत हेमंत गोडसे यांच्या मैत्रीखातर शिवसेनेच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले होते. गोडसे यांच्या विजयानंतर आभार दौऱ्यातही बाळासाहेब वाघ सावलीप्रमाणे गोडसे यांच्यासोबत होते. त्यामुळे वाघ शिवसेनेतच विसावतील असे वाटत असताना, शनिवारी सायंकाळी बारागावपिंप्री येथे आमदार कोकाटे यांच्या हस्ते झालेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला वाघ थेट अध्यक्ष म्हणून हजर राहिले.कोकाटे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी वाघ यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न होत असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर बारागावपिंप्री येथील सभेत वाघ यांनी कोकाटे यांनी राजकीय निर्णय घ्यावा, असे सांगून त्यांच्या कोणत्याही निर्णयासोबत आपण असल्याचे सांगितले. यानंतर कोकाटे यांनी आपल्या भाषणात चौफेर टोलेबाजी करीत संभ्रमात आणखीनच भर टाकली.मी कोणत्या पक्षाचा उमेदवार राहीन याची चिंता करु नका. राज्यात कोणतेही सरकार येऊ द्या, सिन्नरच्या जनतेसाठी पक्ष आणि सरकार आपणच असल्याचे कोकाटे म्हणाले. मी कोणत्याही पक्षात असलो आणि कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी विकासनिधी आणण्याची आपल्यात धमक असल्याचे कोकाटे यांनी सांगितले होते. मी आरपीआयमध्ये गेलो किंवा मायावतीजींचा हत्ती घेतला तरी तुम्ही काळजी करू नका. राजकीय निर्णय घ्यायचा तेव्हा पाहू! अशी फटकेबाजी करीत कोकाटे यांनी जनतेचा संभ्रम कायम ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मलढोण येथील कार्यक्रमात खासदार हेमंत गोडसे, आमदार कोकाटे व पंचायत समितीचे सभापती वाघ एकाच व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी वाघ यांनी पक्ष म्हणून नाही, तर मित्र म्हणून आपण शिवसेनेच्या व्यासपीठावर गेले होतो, असा खुलासा केला. यावेळी कोकाटे व गोडसे यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळल्याने राजकीय चर्चेचीही उधळण होणार यात शंका नाही!