घोळ मिटेना : निधी संपूनही अद्याप योजना होईना पूर्ण
नाशिक : आर्थिक घोटाळ्यांमुळे महापालिकेच्या गाजलेल्या घरकुल योजनेचा गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, ११ हजार २00 घरांपैकी आता फक्त नऊ हजार ७00 घरे बांधण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. कागदोपत्री मात्र महापालिकेने सहा हजार ९६४ घरकुले अखेरच्या टप्प्यात असल्याचे सांगून आता चार हजार २३६ घरे बांधण्यात येणार असल्याचे सांगितले असले, तरी त्यासाठी केवळ ६८ कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यामुळे ९0 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येणार आहे. एवढे करूनही संपूर्ण घरकुल योजना पूर्ण होणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.घरकुल घोटाळ्यासंदर्भात यापूर्वीही महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार्या निर्भय फाउंडेशनला माहितीच्या अधिकारात घरकुलांचे वास्तव मिळाले आहे. जवाहरलाल नेहरू नागरी अभियानाअंतर्गत महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी १६ हजार घरकुले बांधण्याची योजना आखली होती. परंतु नंतर जागा उपलब्ध नाही आणि अन्य अनेक कारणांमुळे ११ हजार २00 घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २४८ कोटी रुपये खर्च करून ही घरकुले बांधण्यात येणार होती. परंतु आत्तापर्यंत १८१ कोटी रुपये खर्च करून योजना पूर्ण झालेली नाही. झोपडपट्टीवासीयांना महापालिकेने २१२0 घरकुले दिल्याचा दावा केला आहे. तसेच २४२0 घरे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे एकूण सहा हजार ९६४ घरांची कामे सुरू असून, आणखी चार हजार २३६ घरकुले बांधण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाने निर्भय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज पिंगळे यांनी मागविलेल्या माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे. महापालिकेला चार हजार २३६ घरे बांधण्यासाठी अवघे ६८ कोटी रुपये शिल्लक असून, त्याचा विचार केला तर एका घरकुलासाठी केवळ ६५ हजार रुपये इतकाच निधी वापरता येणार असल्याने इतक्या रकमेत घरकुल योजना राबविणे केवळ अशक्यप्राय आहे. त्यामुळे महापालिकेने हुडकोकडून ९0 कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी केली आहे. एकीकडे ही आकडेवारी प्रशासन देत असली, तरी प्रत्यक्षात नऊ हजार ७00 घरेच पूर्ण होणार असल्याचे पालिकेच्या प्रगतीपर अहवालात म्हंटले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकार्यांनी देखील जाग आणि अन्य अडचणींमुळे ११ हजार २00 घरेदेखील पूर्ण होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे योजनेत घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याची चौकशी करण्याची मागणी निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज पिंगळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी) -----------------------------------न्यायालयात जाणार■ पालिकेने उच्च न्यायालयात ११ हजार २00 घरे पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. परंतु आता इतकी घरे पूर्ण होत नसतील तर तो न्यायालयाचा अवमान आहे. यासंदर्भात न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली जाणार आहे. घरकुल योजेनतील सर्व घोळ आणि त्याप्रमाणे गैरप्रकारांबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी केली जाईल.- मनोज पिंगळे, संस्थापक, निर्भय फाऊंडेशन --------------------------------योजनेतील गोंधळ■ सात वर्षांनंतरही योजना अपूर्णच■ चुंचाळे शिवारात शहराबाहेर सहा हजार घरकुले बांधण्याचा अट्टहास■ झोपडपट्टीच्या ठिकाणीच घरकुल योजना राबविण्याऐवजी अन्यत्र राबविल्या.■ आनंदवल्लीत जागा ताब्यात नसताना घरकुल योजना राबविण्यासाठी निविदा मंजूर केल्या. त्यानंतर घरे न बांधताही साडेतीन कोटी रुपये ठेकेदारास अदा केले.■ गंगापूर येथे घरकुल योजना रद्द मात्र ती नाशिकरोडला राबवल्याचे दाखवून ठेकेदाराला देयके दिली.■ नाशिकरोड येथे घरकुले बांधता येणार नाही म्हणून निधी परत पाठविला आता पुन्हा तेथेही योजना राबविली.